पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास, नेहरु-इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, दिल्लीत होणार गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोडीत काढला आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने आज दिल्लीत एनडीएची भव्य बैठक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास, नेहरु-इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, दिल्लीत होणार गौरव
pm narendra modi
| Updated on: Jun 10, 2026 | 11:17 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार, १० जून रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचे कौतुक करणारा विशेष गौरव ठराव मंजूर करण्यात येणार आहे.

४,३९९ दिवसांचा रेकॉर्ड मोडला

पंतप्रधान मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सलग ४,३९९ दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम आज १० जूनला मोडीत काढला. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०१९ आणि ९ जून २०२४ रोजी सलग तिसऱ्यांदा शपथ घेत त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एकूण कार्यकाळ १४ वर्षांपेक्षा जास्त असला, तरीही तो सलग नव्हता.

याच पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या भव्य बैठकीला एनडीए-शासित २२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. तर के. राममोहन नायडू (TDP), राजीव रंजन सिंह (JDU), एच.डी. कुमारस्वामी (JDS) आणि अनुप्रिया पटेल (अपना दल-एस) हे मित्रपक्षही या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

या बैठकीत प्रामुख्याने देशाच्या आगामी विकासाचा आणि सुशासनाचा रोडमॅप तयार केला जाणार आहे. यात २०४७ चे लक्ष्य असलेल्या ‘विकसित भारत’ घडवण्याच्या उद्दिष्टावर चर्चा केली जाणार आहे. तसेच ईज ऑफ लिविंग आणि ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ वाढवण्यावर भर दिला जाईल. केंद्र आणि राज्यांमध्ये उत्तम समन्वय साधत राष्ट्रीय विकास प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल.

भूतकाळ विसरा, भविष्यावर लक्ष द्या – पंतप्रधानांचा कानमंत्र

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना कडक आदेश दिले होते. सरकारी कामात कोणतीही दिरंगाई न करता योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच २०२६ मध्ये केवळ भूतकाळातील कामगिरीचे गोडवे न गाता भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला मोदींनी सर्वांना दिला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us