Nitin Gadkari : इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवरुन संपूर्ण देशात वादविवाद सुरु असताना गडकरीचं ओपन चॅलेंज, ‘तुम्ही मला..’
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलचा पुरस्कार करत असतात. वेगवेगळ्या पिकांपासून इथेनॉलचं उत्पादन केलं जातं. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या साखर मिल्स आहेत. साखरेचा संबंध ऊसाशी येतो. यावरुन होणाऱ्या आरोपांवर सुद्धा गडकरी यांनी उत्तर दिलं आहे.

सध्या संपूर्ण देशात E20 पेट्रोलवरुन वादविवाद सुरु आहेत. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवर वेगवेगळे मतप्रवाह पहायला मिळतायत. काही कार चालकांचं म्हणणं आहे की, यामुळे मायलेज कमी होतो, काहींच म्हणणं आहे की, यामुळे इंजिन खराब होतं. आता या सर्व वादावर स्वत: केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बोलले आहेत. त्यांनी E20 पेट्रोलचा विरोध करणाऱ्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. ‘जर, E20 पेट्रोलमुळे एखादी कार खराब झाली असेल, तर त्या कारचं फक्त नाव सांगा’ असं नितीन गडकरी म्हणाले. “आतापर्यंत E20 पेट्रोलमुळे कुठल्याही कारमध्ये टेक्निकल बिघाड झाल्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही” असं गडकरी म्हणाले. भारताला पेट्रोल-डिझेलवरील आपलं अवलंबित्व कमी करावं लागेल असं नितीन गडकरी ‘विकसित भारत’ समीटमध्ये बोलताना म्हणाले. “देशाला दरवर्षी कच्चं तेल आयात करण्यासाठी 22 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. इथेनॉल सारख्या बायोफ्यूलचा वापर वाढला, तर फक्त परदेशी मुद्राच वाचणार नाही, तर प्रदूषणही कमी होईल” असं नितीन गडकरी म्हणाले.
‘E20 पेट्रोल बद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत’ असं नितीन गडकरी म्हणाले. “काही लोक जाणूनबुजून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कुठल्याही कार उत्पादकाने E20 पेट्रोलमुळे मोठ्या प्रमाणात वाहनं खराब झाल्याची पृष्टी केलेली नाही. भारताने आधीच 20 टक्के इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलचं लक्ष्य साध्य केलं आहे” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. सरकारच्या मते यामुळे कच्चा तेलाची आयात कमी होईल. कार्बन उत्सजर्न सुद्धा कमी होईल. ऊस, मका आणि तांदूळ यापासून इथेनॉल बनवलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो.
तुमच्या मालकीचे साखर कारखाने, या आरोपावर गडकरी काय म्हणाले?
गडकरी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले की, “त्यांच्या कुटुंबाचे साखर कारखाने जरुर आहेत. पण त्यांचा व्यवसाय इथेनॉल उत्पादनावर अवलंबून नाही” सरकारचा उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आहे. कुठल्या खासगी कंपनीला फायदा पोहोचवणं नाही असं ते म्हणाले. मक्यापासून इथेनॉल बनवण्याचं धोरण लागू झाल्यापासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शेतकऱ्यांना 45 हजार कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. आधी मक्याची किंमत 1200 रुपये प्रति क्विंटल होती, जी वाढून आता 2800 रुपये प्रति क्विंटल झाली आहे.