शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 9 नेत्यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र, पत्रात काय म्हटलं?; तक्रार काय?

| Updated on: Mar 05, 2023 | 10:00 AM

या पत्रात राज्यपालांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांची भूमिका योग्य नाही. जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामात राज्यपाल हस्तक्षेप करत आहेत. केंद्र आणि राज्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 9 नेत्यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र, पत्रात काय म्हटलं?; तक्रार काय?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्षातील 9 बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडीचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचं सांगतानाच या पत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 प्रमुख नेत्यांनी या पत्रावर सही केली आहे. त्यामुळे या पत्रावर भाजपकडून कसे उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या पत्रातून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा सिसेमिरा लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवली जाते. त्यांना क्लीनचिट दिली जाते, असं या पत्रात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांवर टीका

या पत्रात राज्यपालांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांची भूमिका योग्य नाही. जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामात राज्यपाल हस्तक्षेप करत आहेत. केंद्र आणि राज्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्याला कारण राज्यपाल आहेत, असं या पत्रात म्हटलं आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत त्यावर चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

भाजप काय उत्तर देणार?

दरम्यान, भाजपने अजून या पत्रावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपकडून या पत्रावर काय उत्तर दिलं जातं? किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या पत्रावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून भाजपकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या नेत्यांच्या सह्या

या पत्रावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या सह्या या पत्रावर आहेत.