सर्वात मोठी बातमी ! नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप साथसाथ, विरोधकच नसतील; कसं असेल नवं सरकार?

विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने सात जागा जिंकल्या आहेत. पण राष्ट्रवादीने विरोधात जाण्याऐवजी भाजपला आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात मोठी बातमी ! नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप साथसाथ, विरोधकच नसतील; कसं असेल नवं सरकार?
bjp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2023 | 8:43 AM

कोहिमा : नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीचं सरकार येणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीपीपी सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. यावेळी राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं जाणार आहे. म्हणजे राज्यात कोणताही विरोधी पक्ष नसेल. राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकलेल्या सर्व पक्षांचं सरकार येणार आहे. पहिल्यांदाच राज्यात विरोधी पक्ष नसणार आहे. हे या निकालाचं वैशिष्ट ठरणार आहे.

नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याच विरोधी पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे सर्वांनीच भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचा कट्टर विरोधक मानला जात असला तरी नागालँडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात मोठा पक्ष कोणता?

2 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. 60 सदस्य असलेल्या विधानसभेत एनडीपीपीने सर्वाधिक 25 जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल भाजपने 12, रिपब्लिकन पक्षाने दोन, राष्ट्रवादीने 7 आणि नॅशनल पिपल्स पार्टीने 5 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत 4 अपक्ष निवडून आले आहेत. जनता दलाला एक जागा जिंकता आली आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने दोन, नागा पिपल्स फ्रंटने दोन जागा जिंकल्या आहेत. विधानसभेत बहुमतासाठी 37 जागांची आवश्यकता आहे.

आठवले, पासवानांच्या पक्षाची एन्ट्री

विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने सात जागा जिंकल्या आहेत. पण राष्ट्रवादीने विरोधात जाण्याऐवजी भाजपला आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच सर्व पक्षीय सरकार निर्मआण होणार आहे. देशात 2015 आणि 2021 मध्ये सर्व पक्षीय सरकारे आली होती. पण नागालँडमध्ये पहिल्यांदाच सर्वपक्षीय सरकार येत आहे. राज्याच्या राजकारणात रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयने आणि रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोजपाने पहिल्यांदाच एन्ट्री घेतली आहे. मात्र, आरपीआय, लोजपा आणि जेडीयूने आधीच भाजपला पाठिंब्याचं पत्र दिलं आहे.

बावनकुळे काय म्हणाले?

भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची माहिती दिली आहे. नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहे. तिथल्या स्थानिक समीकरणानुसार दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. नागालँडचा प्रयोग महाराष्ट्रात होण्याची परिस्थिती नाही, सध्या आम्ही सत्तेत मजबूत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.