Narendra Modi | ‘काही जणांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजे’, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत नेमकं काय बोलून गेले?

केंद्रीय तपास यंत्रणांनाकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. कारवाई करणाऱ्या संस्थांमध्ये ईडी (ED), सीबीआय (CBI), इनकम टॅक्स (Income Tax) सारख्या संस्थांचा समावेश आहे.

Narendra Modi | काही जणांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत नेमकं काय बोलून गेले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Chetan Patil | Updated on: Feb 08, 2023 | 5:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांनाकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. कारवाई करणाऱ्या संस्थांमध्ये ईडी (ED), सीबीआय (CBI), इनकम टॅक्स (Income Tax) सारख्या संस्थांचा समावेश आहे. या तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार काम करतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे विविध पक्षांचे विरोधकांनी भाजप आणि केंद्र सरकारविरोधात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निश्चय केलाय. हाच मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत खेचला. यावेळी त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.

“अध्यक्ष महोदय, सभागृहात भ्रष्टाचार विरोधात तपास करणाऱ्या तपास यंत्रणांबद्दल बरंच काही बोललं गेलं. मी एक पाहिलं की, अनेक विरोधी पक्ष इतरांच्या सुरात सूर मिसळत होते. मिले तेरा मेरा सूर”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘त्यांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजेत’

“मला वाटत होतं, देशाची जनता, देशाच्या निवडणुकीचे निकाल अशा लोकांना जरुर एका मंचावर आणेल. पण तसं झालं नाही. पण या लोकांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजेत. कारण ईडीच्या कारणास्तव ते एकाच मंचावर आले आहेत”, असा टोला मोदींनी लगावला.

“ईडीने या लोकांना एका मंचावर आणलं आहे. त्यासाठी जे काम देशाचे मतदार करु शकले नाहीत, ते ईडीने केलं”, असा चिमटा नरेंद्र मोदी यांनी काढला.

“लोकशाहीत टीका-टीप्पणीला खूप महत्त्व असल्याचं मी मानतो. मी नेहमी मानतो की, भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. आमच्यामध्ये अनेक युगांपासून लोकशाही आहे. त्यामुळे टीका-टीप्पणी या लोकशाहीसाठी चांगलं आहे. पण दुर्दैवाने कुणीच मेहनत करुन पुढे येत नाही”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“कुणीतरी अभ्यास करुन टीका करेल ज्यामुळे देशाला फायदा होईल, याची मी वाट पाहतोय. पण गेल्या नऊ वर्ष टीकांनी आरोपांमध्ये घालवले. आरोपांशिवाय काहीच नाही”, असा दावा मोदींनी केला.

‘विरोधकांकडून आरोप, शिवीगाळ केली जाते’

“आरोप, शिवीगाळ, काहीही बोलून टाका याशिवाय काहीच केलं नाही. त्यानंतर निवडणुकीत पराभव झाला की इव्हीएम मशीन खराब. देवून टाका शिवीगाळ”, असं मोदी म्हणाले.

“निवडणूक आयोगाला शिव्या देतात. कोर्टातला निकाल मनासारखा आला नाही तर सुप्रीम कोर्टाला शिवीगाळ केली जाते”, असा दावा त्यांनी केला.

“जर भ्रष्टाचाराची चौकशी होतेय तर तपास यंत्रणांना शिवीगाळ द्या. सैन्य पराक्रम करेल, आपलं शौर्य दाखवेल, तर सैन्यावर टीका केली जाते. कधी आर्थिक, देशाच्या प्रगतीच्या बातम्या आल्या की, जगभरातील संस्था भारताचा गौरव करत असतील तर इथून निघा, आरबीआयला शिवीगाळ देणार, भारताच्या आर्थिक संस्थांना शिवीगाळ करणार”, असा टोला मोदींनी लगावला.

Follow Us