
इराण वि. अमेरिका- इस्रायलमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे, पण या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडले आहेत. मोठी जीवित हानि तर होत आहेच, पण इंधन तुटवडाही जाणवत आहे. या तिन्ही देशांसोबतच भारतालाही युद्धाची झळ प्रचंड जाणवत आहे. एलपीजी टंचाई, निर्यात ठप्प यामुळे मोठं नुकसान होत असून सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आखाती राष्ट्रांमधील या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेची भूमिका स्वीकारली होती. त्यातच आता पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा पाऊल उचललं आहे. पीएम मोदी यांनी युद्ध सुरू असलेल्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करत त्यांच्याशी संवाद साधला. इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी, भारतीयांच्या सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याची माहिती दिली. 14 दिवसांपासून इराणमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे, तेव्हापासून दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच थेट चर्चा असून, सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत या संवादाला जागतिक स्तरावर मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
पंतप्रधानांनी दिली माहिती
X (पूर्वीचं ट्विटर) वरील अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी यांनी या चर्चनंतर माहिती दिली. ‘मध्य पूर्वेतील गंभीर परिस्थितीवर इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली. या प्रदेशातील वाढता तणाव, नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली’ असं त्यांनी नमूद केलं.
“भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूचा विनाअडथळा पुरवठा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे.” असं मोदींनी स्पष्ट केलं. ” इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणात मी शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संवाद आणि राजनैतिकतेचे आवाहनही केले” असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांत भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तीन चर्चा झाल्या आहेत असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं होतं.
Had a conversation with Iranian President, Dr. Masoud Pezeshkian, to discuss the serious situation in the region.
Expressed deep concern over the escalation of tensions and the loss of civilian lives as well as damage to civilian infrastructure.
The safety and security of…
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2026
भारतातील तेल आणि वायू संकटातून दिलासा!
खरं तर, पंतप्रधान मोदी आणि इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यामधील चर्चेमुळे भारतातील संभाव्य तेल आणि वायू संकटातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांना तेल आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीत इराणी मदत सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिक आणि त्या मार्गावर भारतीय वस्तू वाहून नेणाऱ्या जहाजांच्या सुरक्षिततेबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. इराकमध्ये अमेरिकन जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला होता. इराणने आधीच चीनला जहाजे नेण्याची परवानगी दिली आहे. भारतालाही इराणकडून ही सवलत मिळू शकेल आणि आयआरजीसी त्यावर हल्ला करणार नाही असं समजतं.
स्ट्रेट ऑर्फ होर्मुज बंद
दरम्यान इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्लाह मोजतबा खामेनी यांनी गुरूवारी पहिल्यांदाच जगाला संबोधित केले. होर्मुझची सामुद्रधुनी सध्या बंद राहील.इराणचे त्यांच्या आखाती अरब शेजाऱ्यांवर हल्ले सुरूच राहतील असं त्यांनी सांगितलं. इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याने आखाती देशांना तेथील अमेरिकन लष्करी तळ बंद करण्याचे आवाहन केले.
भारतीय जहाजांना प्रवासाची परवानगी
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गेल्या काही दिवसांत तीन वेळा चर्चा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इराणने जहाजांना भारतात जाण्याची परवानगी दिली आहे का असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, यावर अधिक भाष्य करणे घाईचे ठरू शकतं.