Cabinet Expansion: मोदींचे विश्वासू ते मोदी मंत्रिमंडळातून डच्चू, प्रकाश जावडेकरांना का हटवलं?

| Updated on: Jul 07, 2021 | 6:47 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांचे राजीनामेही घेतले आहेत. मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी असलेले प्रकाश जावडेकर यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. (Modi cabinet expansion)

Cabinet Expansion: मोदींचे विश्वासू ते मोदी मंत्रिमंडळातून डच्चू, प्रकाश जावडेकरांना का हटवलं?
prakash javadekar
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांचे राजीनामेही घेतले आहेत. मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी असलेले प्रकाश जावडेकर यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जावडेकर यांचं कुठे चुकलं? माशी नेमकी कुठं शिंकली की ज्यामुळे जावडेकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. (Prakash Javadekar resigns as Union Minister from Modi govt)

मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांच्याकडे वन आणि पर्यावरण मंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार होता. त्यानंतर पहिल्या टर्ममध्ये झालेल्या विस्तारात जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले. विशेष म्हणजे स्मृती ईराणी यांच्याकडे असलेलं हे महत्त्वाचं पद जावडेकर यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्याकडे केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. मात्र, अचानक त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

परफॉर्मन्स चांगला तरीही राजीनामा

जावडेकरांची केंद्रीय मंत्री म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळे कामगिरीच्या मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा घेतला असावा यात काही तथ्य नाही. त्यांच्याकडे अन्य संघटनात्मक जबाबदारी देण्यात येणार असावी, त्यामुळेच त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असावं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

प्रत्येकवेळी पत्ता कापला असं म्हणता येणार नाही

जावडेकर यांच्या राजीनाम्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपमध्ये असं धक्कातंत्रं कधीकधी वापरलं जातं. त्या पक्षात बऱ्याचदा संघटनेच्या कामालाही महत्त्व दिलं जातं. त्यांना संघटनात्मक कामातली जबाबदारी देण्याचा भाजपचा उद्देश असू शकतो. प्रत्येकवेळी पत्ता कापला असं म्हणता येणार नाही. कारण भाजपची पक्ष म्हणून वेगळी रचना आहे. त्यामुळे त्या पद्धतीने ते निर्णय घेत असतात, असं विजय चोरमारे यांनी सांगितलं.

घाईत निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही

आता जावडेकरांना नेमका पदाचा राजीनामा का द्यावा लागला? ते पर्यावरण मंत्री होते, त्यात त्यांनी काही निर्णय घेतले की आणखी काही दबाव वगैरे होता हे ही पाहिलं पाहिजे. त्यांना सात वर्ष संधी देण्यात आली आहे. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही, असंही चोरमारे म्हणाले.

मोदींचा धक्कातंत्रात हातखंडा

जावडेकरांचा मंत्री म्हणून परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. त्यामुळे कामगिरीच्या कारणावरून त्यांचा राजीनामा घेतला असावा यात काही तथ्य आहे असं वाटत नाही. राष्ट्रीय राजकारणातील काही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, तिथे त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. धक्कातंत्र वापरणं हे मोदींचं तंत्र आहे. धक्कातंत्रामुळे देशातील प्रश्नांवरील रोख इतरत्रं वळवला जातो. सरकारचं अपयश लपवलं जातं. त्यासाठी भाजप असे निर्णय घेत असते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. (Prakash Javadekar resigns as Union Minister from Modi govt)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra New Ministers: ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’; नारायण राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मंत्रिमंडळ विस्ताराआधी महाराष्ट्राला धक्का, प्रकाश जावडेकरांना मंत्रिमंडळातून डच्चू, वाचा नारळ दिलेल्या 12 मंत्र्यांची नावं

Modi Cabinet List: 10 मंत्र्यांना बढती, 33 नव्या चेहऱ्यांचा समावेश, नव्या विस्तारात कोणकोण घेणार शपथ वाचा

(Prakash Javadekar resigns as Union Minister from Modi govt)