आता पंजाबमध्ये मोठा भूकंप… सकाळी सकाळीच कॅबिनेट मंत्र्याच्या घरी… राजकारणात मोठी खळबळ; आम आदमी पार्टीला टेन्शन
पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा यांच्या घरी EDने धाड टाकली आहे. 100 कोटींहून अधिक रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आपचे नेते संजय सिंह आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते याला राजकीय सूडाचे राजकारण म्हणत आहेत.

पंजाबमध्ये सकाळी सकाळीच मोठी खळबळ उडाली आहे. पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोडा यांच्या घरी सकाळी सकाळीच ईडीने छापेमारी केली आहे. ईडीचे अधिकारी एक दोन नव्हे तर तब्बल 20 वाहने घेऊन थेट संजीव अरोडा यांच्या घरी दाखल झाले. संजीव अरोडा यांचं घर चंदीगडच्या सेक्टर 2 येथे आहे. सकाळी सकाळीच 7 वाजून 25 मिनिटांनी ईडीचा ताफा दारात आल्याने सर्वच हादरले. लगेचच तीन डझन सीआयएफचे जवान आणि एसएफचे जवान घराबाहेर तैनात करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा हंगामा होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. ईडीने कारवाई सुरू केल्याने आपचे नेते, खासदार संजय सिंह यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सुपारी किलर ईडी आज परत पंजाबला आली आहे, असा हल्लाच संजय सिंह यांनी चढवला आहे.
पंजाब सराकरमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या संजय अरोडा यांच्या घरी छापेमारी सुरू झाली आहे. दोन ते तीन तास तमाशा सुरू राहील. या काळात खोट्या बातम्या सुरू होतील. त्यानंतर सुपारी किलर परत निघून जातील. त्यानंतर त्यांच्या मालकाकडून त्यांना नवा टास्क दिला जाईल, असा हल्लाबोलच संजय सिंह यांनी ट्विटरवरून केला आहे.
भगवंत मान सरकारला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे. पंजाबच्या जनतेचं काम रोखण्यासाठी अजून काय काय करणार आहात? किती त्रास देणार आहात? असा संतप्त सवालही संजय सिंह यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
मोदींना सांगू इच्छितो की,…
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही ईडीच्या कारवाईवरून जोरदार हल्ला चढवला आहे. आज परत भाजपची ईडी संजीव अरोडा यांच्या घरी आली आहे. एका वर्षात तिसऱ्यांदा भाजची ईडी अरोडा यांच्या घरी आली आहे. तर एक महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. तरीही त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही, असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी मोदींना सांगू इच्छितो की, पंजाब ही गुरुंची धरती आहे. औरंगजेबही पंजाबच्या लोकांना झुकवू शकला नाही. इंग्रजांसमोर मान न तुकवणाऱ्या भगत सिंग यांची ही धरती आहे. त्यामुळे पंजाब मोदींच्या कोणत्याही चाली समोर झुकणार नाही. ईडी आणि भाजपच्या अभद्र युतीला पंजाब संपुष्टात आणेल, असा हल्लाही मान यांनी केला आहे.
ईडीची छापेमारी
ईडी, पीएमएलए, 2002 अंतर्गत संजीव अरोडा आणि त्यांच्याशी संबंधितांच्या चार ठिकाणी छापेमारी करत आहे. चंदीगड आणि दिल्लीच्या एनसीआर परिसरात ही छापेमारी सुरू आहे. संजीव अरोडांना राज्य सरकारने राहण्यासाठी मंत्री निवास दिलं होतं, तिथंही ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीने दिल्ली, गुडगाव आणि चंदीगडच्या हॅम्पटन स्काय रिअॅल्टी लिमिटेड कार्यालय परिसरात आणि संजीव अरोडांच्या घरासहीत 5 ठिकाणी छापेमारी केली आहे.
संजीव अरोडा यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग केलं होतं. यात 100 करोड रुपयाहून अधिक मोबाईल फोनची बनावट जीएसटी खरेदी आणि दुबईतून भारतात अवैध संपत्तीचे राऊंड ट्रिप निर्यातीचा समावेश होता, असं ईडीचं म्हणणं आहे.
