दक्षिणेतून सीमोल्लंघन होईल का? सत्तेचे उत्तर मिळेल का? मुसळधार पावसानेही त्यांचे गणित बिघडवले नाही; व्हिडीओ व्हायरल

म्हैसुरमध्ये जोरदार पाऊस सुरु असतानाच राहुल गांधींनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दक्षिणेतून सीमोल्लंघन होईल का? सत्तेचे उत्तर मिळेल का? मुसळधार पावसानेही त्यांचे गणित बिघडवले नाही; व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Oct 02, 2022 | 10:46 PM

म्हैसूरः राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्याच्याआधीपासून ही यात्रा चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे. कर्नाटकातील भारत जोडी यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज तिसरा दिवस होता. त्यामुळे रविवारी संध्याकाळी म्हैसूरच्या एपीएमसी मैदानावर राहुल गांधींनी तडाखेबंद भाषण केले. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) भाषण सुरु असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली.

 

तरीही राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले होते. या भाषणात त्यांनी अक्षरशः भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल चढविला. राहुल गांधींच्या या भाषणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

कर्नाटकात भाजपचे राज्य आहे, त्याच कर्नाटकात राहुल गांधींच्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांनी रविवारी नंजनगुडमध्ये प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूरमधील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधितही केले.

राहुल गांधी यांचे भाषण सुरु झाले आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्या जोरदार पावसातही राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याचवेळी त्यांनी आरएसएसवरही निशाणा साधला. भर पावसातही त्यांनी आपले भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही सुरुच ठेवल्या होत्या.

म्हैसुरमध्ये जोरदार पाऊस सुरु असतानाच राहुल गांधींनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये राहुल गांधींची सभा सुरु असतानाच पाऊस कोसळत आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आता भारत जोडो यात्रा ही कर्नाटकात पोहोचली आहे. त्यामुळे आता हा प्रवास नदीसारखाच असणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा होणार आहे.

या नदीसारख्या प्रवासात तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. तर फक्त प्रेम आणि बंधुभाव दिसणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आमचा हा प्रवास थांबणार नाही.

या प्रवासाचा एकच हेतू आहे तो म्हणजे देशात भाजप आणि आरएसएसकडून पसरवला जाणाऱ्या द्वेषाविरोधात येथे उभा राहायचे आहे असंही त्यांनी सांगितले.

या सभेनंतर राहुल गांधींनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की,भारत को एकजुट करने से,हमें कोई नहीं रोक सकता। भारत की आवाज़ उठाने से,हमें कोई नहीं रोक सकता। कन्याकुमारी से कश्मीर तक जाएगी, भारत जोड़ो यात्रा को कोई नहीं रोक सकता। अशा शब्दात त्यांनी विश्वासही देखील दिला आहे.

राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त म्हैसूर येथील खादी ग्रामोद्योग केंद्रालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची हत्या करणाऱ्या विचारसरणीने गेल्या आठ वर्षांमध्ये विषमता आणि विभाजनाला जन्म दिला असल्याचे म्हणत आरएसएसवर त्यांनी निशाणा साधला.

कर्नाटकात राहुल गांधींची यात्रा जाण्यापूर्वी राहुल गांधींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेली पोस्टर फाडून टाकण्यात आली.

पोस्टर फाडल्याप्रकरणी कर्नाटक काँग्रेसने भाजपला जबाबदार धरले असून चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट भागात ही घटना घडल्यानंतर भाजप-काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता होती.