जात-धर्म पाहून मुलाखत, देशात लाच घेऊनच नोकर भरती, रामदेव बाबांचा आंदोलनाचा इशारा
योगगुरू रामदेव बाबांनी सरकारी नोकरभरती प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, देशात ९९% सरकारी नोकऱ्यांमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळा होतो, जिथे जात, धर्म, वर्ग पाहून लोकांना नोकरी दिली जाते. लाचखोरीमुळे गुणवत्ता डावलली जात आहे. हे थांबले नाही, तर दुसऱ्यांदा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

देशात चोहोबाजूंनी हंगामा आहे. सरकारी नोकऱ्यांच्या मुलाखतीत मोठ्या प्रमाणावर गडबड होते. जात, धर्म, वर्ग, संघटनेच्या लोकांना फायदा देऊन इतरांना नोकरीपासून दूर केलं जात आहे. देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 99 टक्के घोटाळा आहे, असा खळबळजनक दावा करतानाच हे प्रकार बंद झाले पाहिजे. नाही तर मला दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागेल, असा इशाराच योगगुरू बाबा रामदेव यांनी दिला आहे. जंतरमंतरवर झालेल्या जेनजी आंदोलनाच्या संदर्भाने रामदेव बाबा बोलत होते.
80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रामदेव बाबांनी नोकर भरती प्रक्रियेवरच बोट ठेवलं. भरती प्रक्रियेत मुलाखतीच्या वेळी लाच आणि शिफारस केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये 90 ते 99 टक्के घोटाळा होतो. आपल्या जात, वर्ग, धर्म, समुदाय आणि विचारांच्या लोकांना नोकरी दिली जाते. इतरांना धक्का मारला जातो. हे सर्व अपमानजनक आहे आणि लोकशाहीच्या विरोधी आहे, असं रामदेव बाबांनी म्हटलंय.
आता तरी सुधरा…
देशात चाहोबाजूने हंगामा आहे. मुलं म्हणतात शाळेत शिक्षक नाहीत. वीज नाही, पाणी नाही, शौचालये नाहीत. कुठे कॉपी होते. काही ठिकाणी पेपर फुटतो. तर कुठे सरकारी नोकऱ्यांमध्ये 99 टक्के घोटाळा होतो, असं सांगतानाच आता तरी सुधरा. नाही तर अधिक आंदोलने होतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशात घोटाळे अधिक आहेत, असा दावाही त्यांनी केला.
भरतीचा खेळ सुरू
एकीकडे आपण सत्यमेव जयतेची घोषणा करतो. दुसरीकडे लाखो कोटी रुपये देऊन नोकऱ्या दिल्या जात आहे. जर देशात आंदोलने सुरू राहिली तर देश कसा चालेल? आता देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 लाख ते एक कोटी रुपये देऊन भरतीचा खेळ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अराजकतेचं समर्थन नाही
आताही वेळ गेली नाही. सुधारलं पाहिजे. नाही तर देशात आणखी आंदोलने होतील. आंदोलनाच्या नावावर अराजकतेचं आम्ही समर्थन करणार नाही. तसं सहनही करणार नाही. पण देशात घोटाळे प्रचंड आहेत हे वास्तव आहे. हे घोटाळे बंद झाले पाहिजे. नाही तर मला दुसऱ्यांदा आंदोलन करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आज देश द्वेष आणि घृणेचं वातावरण तयार झालं आहे. देशातील संसदेत सत्ताधारी आणि विरोधक हे पाकिस्तान आणि भारतासारखे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, असंही ते म्हणाले.
