राहुल गांधी 2024मध्ये पंतप्रधान होतील काय?; संजय राऊत यांचा दावा काय?

| Updated on: Jan 21, 2023 | 1:08 PM

थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही.

राहुल गांधी 2024मध्ये पंतप्रधान होतील काय?; संजय राऊत यांचा दावा काय?
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जम्मू: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत सध्या जम्मूत आहेत. जम्मूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. या यात्रेत जम्मूतील हजारो नागरीक सहभागी झाले आहेत. इतर राज्यांप्रमाणेच जम्मूतही या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली असल्याचं सांगितलं आहे. तसेच येणाऱ्या काळात राहुल गांधी चमत्कार घडवतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. राहुल गांधी हे पंतप्रधान बनतील काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट उत्तर दिलं. राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात. कोणताही व्यक्ती देशाचं नेतृत्व करू शकतो. पंतप्रधानपदाबाबत 2024नंतर ठरवू. लोकांना जर वाटलं राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनावं तर त्यांना बनावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी तेच आहेत

पूर्वीचे राहुल गांधी आणि आताच्या राहुल गांधी यांच्यात काय फरक पडला? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. व्यक्ती आणि नेतृत्वात फरक करणार नाही. राहुल गांधी तेच आहेत. ज्या राहुल गांधींच्या बाबत तुम्ही विचार करता त्या राहुल गांधींना मी मारलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. ते आपण पाहातच आहात, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपने ती प्रतिमा तयार केलीय

राहुल गांधींची जी भाजपने प्रतिमा तयार केली आहे. ती चुकीची आहे. तुमच्या मनातील राहुल गांधी यांची जी प्रतिमा आहे. ती लोकांनी तोडली आहे. राहुल गांधी 4500 किमीपेक्षा अधिक अंतर पायी चालत आहेत. हे हिंमतीचं काम आहे. त्याकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही. त्यामुळेच शिवसेना या यात्रेत सामील झाली, असंही त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी चमत्कार घडवतील

येणाऱ्या काळात राहुल गांधी यांचं नेतृत्व चमत्कार करेल. राहुल गांधी हे येणाऱ्या काळात आपल्या नेतृत्वाची चमक दाखवून आव्हान उभं करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही राजकीय नाही. त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका, असंही ते म्हणाले.

सेकंड, थर्ड फ्रंट सोडा

यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाची खिल्ली उडवली. थर्ड फ्रंटचा प्रयोग अनेकदा झाला. तो अपयशी झाला आहे. सेकंड, थर्ड फ्रंटच्या गोष्टी सोडल्या पाहिजे. वेगवेगळे गट चालू शकत नाहीत. काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट चालू शकत नाही. आज काँग्रेसकडे खासदार कमी आहेत. पण 2024मध्ये काँग्रेसचे खासदार वाढतील, असा दावाही त्यांनी केला.