
दिल्ली उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान महत्वाची टिप्पणी केली आहे. एखाद्या व्यक्ती लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवत असेल आणि नंतर कुंडली जुळत नाहीय सांगून मागे फिरला, तर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत खटला चालवला जाईल. फसवून ठेवलेल्या शारीरिक संबंधांसाठी हे कलम लागतं. जस्टिस स्वर्ण कांता शर्मा यांचं खंडपीठ एका आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करत होतं. त्याच्यावर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून लग्नाच्या आश्वासनावरुन मागे फिरण्याचा आरोप होता. आरोपी 4 जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहे. कोर्टाने आरोपीचं म्हणणं फेटाळून लावलं. हे नातं परस्पर सहमतीने होतं. दोघे परस्परांना आठ वर्षांपासून ओळखत होते.
आपल्या लग्नात कुठलाही अडथळा येणार नाही असं आरोपीने पीडित महिलेला वारंवार आश्वासन दिल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं. यात कुंडली जुळवण्याचा मुद्दा सुद्धा होता. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं की, पीडितेने नोव्हेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा तक्रार दिली होती. आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली होती.
हा फक्त नातं बिघडण्याचा विषय नाहीय
त्यानंतर पुन्हा कुंडली जुळत नसल्याचं कारण देऊन लग्नाला नकार दिला. जानेवारी 2026 मध्ये या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (रेप) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत केस नोंदवण्यात आली. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की, हा फक्त नातं बिघडण्याचा विषय नाहीय. आरोपीने जो शब्द दिला, त्याच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
कोर्टाने काय म्हटलं?
सध्याची केस एक वेगळं प्रकरण आहे. आधी शब्द द्यायचा मग कुंडलीचं कारण देऊन लग्नापासून मागे हटायचं. हे गुन्ह्याच्या श्रेणीत येतं असं जस्टिस स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या. कोर्टाने आरोपीचा जामीन अर्जही फेटाळून लावला.
कुटुंबाच्या कुंडलीच्या अटीची माहिती होती, तर…
आरोपांचं गांभीर्य आणि चौकशी दरम्यान मिळालेले पुरावे लक्षात घेऊन आरोपीला दिलासा देण्याच्या विचारात नाहीय हे कोर्टाने स्पष्ट केलं. या प्रकरणात अजून आरोपपत्र दाखल झालेलं नाही ही बाब सुद्धा कोर्टाने ध्यानात घेतली. आरोपीला जर आपल्या कुटुंबाच्या कुंडलीच्या अटीची माहिती होती, तर त्याने वारंवार खोटं आश्वासन द्यायला नको होतं हे कोर्टाने स्पष्ट केलं.