भाजपचा अजून एक मित्रपक्ष दुरावणार?, बेनिवाल 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणार

| Updated on: Dec 20, 2020 | 9:12 AM

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात NDAतील घटक पक्ष असलेल्या RLPचाही समावेश आहे.

भाजपचा अजून एक मित्रपक्ष दुरावणार?, बेनिवाल 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणार
Follow us on

नवी दिल्ली: शिवसेना आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. आता हनुमान बेनिवाल यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षही NDAमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. बेनिवाल 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणार आहेत. NDAमध्ये राहायचं की नाही? हा निर्णयही तिथेच होणार असल्याची माहिती RLPकडून देण्यात आली आहे. (RLP president Hanuman Beniwal warns central government)

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात NDAतील घटक पक्ष असलेल्या RLPचाही समावेश आहे. RLPचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी यापूर्वीच शेतकरी आंदोलनाला आपलं समर्थन असल्याचं म्हटलंय.

3 समितींच्या सदस्यत्वाचा राजीनामा

बेनिवाल यांनी यापूर्वीच संसदेच्या 3 समितींच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्यात उद्योगांसंबधी स्थायी समिती, याचिका समिती आणि पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाची सल्लागार समितींचा समावेश आहे. बेनिवाल यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवला आहे.

2 लाख शेतकऱ्यांसह ‘चलो दिल्ली’

हनुमान बेनिवाल यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याचा सातत्यानं विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली होती. आता 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली पायी मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर दिल्लीत पोहोचल्यावर NDA मध्ये राहायचं की नाही? याबाबतही घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बेनिवालांचं अमित शाहांना पत्र

बेनिवाल यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कृषी कायद्यांबाबत एक पत्रही लिहिलं होतं. केंद्र सरकारनं नवे कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर NDAमध्ये राहायचं की नाही याचा विचार करु, अशी भूमिका बेनिवाल यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या: 

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

RLP president Hanuman Beniwal warns central government