समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला – सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसबाळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरंभलेल्या कार्याला आता १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या १०० वर्षांच्या प्रवासात अनेक जण सहयोगी तथा सहभागी झाले आहेत. हा प्रवास निश्चितच कठीण, आव्हानांनी व्यापलेला होता. या खडतर प्रवासात सर्वसामान्य जनतेचे असलेले सहकार्य हा एक सकारात्मक पैलू होता.

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला - सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसबाळे
RSS 100 Years
| Edited By: | Updated on: Oct 01, 2025 | 8:01 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरंभलेल्या कार्याला आता १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या १०० वर्षांच्या प्रवासात अनेक जण सहयोगी तथा सहभागी झाले आहेत. हा प्रवास निश्चितच कठीण, आव्हानांनी व्यापलेला होता.या खडतर प्रवासात सर्वसामान्य जनतेचे असलेले सहकार्य हा एक सकारात्मक पैलू होता. आज, जेव्हा आपण शताब्दी वर्षाचा विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक घटना, प्रसंग तसेच या प्रवासाच्या यशासाठी स्वतःला समर्पित करणारे व्यक्ती आठवल्याशिवाय राहत नाही किंबहुना त्यांचे स्मरण आवश्यक आहे.

देशभक्तीने ओतप्रोत असलेले सुरुवातीचे ते तरुण कार्यकर्ते शूरवीर योद्ध्यांप्रमाणे संघाच्या कार्यासाठी संबंध देशभरात गेले. अप्पाजी जोशींसारखे गृहस्थ असोत किंवा दादाराव परमार्थ, बाळासाहेब आणि भाऊराव देवरस, यादवराव जोशी, एकनाथ रानडे इत्यादी प्रचारक असोत, डॉ. हेडगेवार यांच्या सानिध्यात येऊन, त्यांनी संघाच्या कार्याला आपले जीवनव्रत मानले आणि जीवनभर त्याचे पालन केले.

समाजाच्या समर्थनाने संघाचे कार्य अहर्निश वृद्धिंगत होत राहिले. संघाचे कार्य सामान्य लोकांच्या भावनांशी एकरूप असल्याने, समाजात संघकार्याची स्वीकृती हळूहळू वाढत गेली. स्वामी विवेकानंदांना एकदा त्यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान विचारण्यात आले होते की, भारतातील बहुतेक लोक निरक्षर आहेत. त्यांना इंग्रजीही येत नाही, मग तुमचे विचार भारतातील लोकांपर्यंत कसे पोहोचतील? त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले की, ज्याप्रमाणे मुंग्यांना साखर शोधण्यासाठी इंग्रजी शिकण्याची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे माझ्या भारतातील लोक त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानामुळे कोणत्याही कोपऱ्यात सुरू असलेले पुण्य कार्य लगेच ओळखतात. ते शांतपणे तिथे पोहोचतात. म्हणून, मी काय म्हणतोय ते त्यांना नक्की समजेल. स्वामीजींचे हे हे विधान तंतोतंत खरे ठरले. त्याचप्रमाणे, संघाचे हे पुण्यकार्य जरी तुलनेने संथ असली तरी सामान्य जनतेकडून निरंतर स्वीकृती, पाठिंबा मिळवत आहे.

संघ कार्याच्या सुरुवातीपासूनच संघ कार्यकर्त्यांना संपर्कीत आणि नविन नविन सामान्य कुटुंबांकडून सहकार्य,पाठिंबा मिळाला आहे. स्वयंसेवकांचे कुटुंबच संघ कार्याचे केंद्र राहिले आहे. सर्व माता आणि भगिनींच्या सहकार्यानेच संघकार्य परिपूर्ण झाले आहे.

संघाच्या प्रेरणेने दत्तोपंत ठेंगडी, यशवंतराव केळकर, बाळासाहेब देशपांडे, एकनाथ रानडे, दीनदयाळ उपाध्याय आणि दादासाहेब आपटे यांसारख्या लोकांनी संघ प्रेरणेने सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात संघटना स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व संघटना आजमितीला लक्षणीयरीत्या विस्तारत असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात आपली सक्रिय भूमिका बजावत आहेत. राष्ट्रहितासाठी काम करण्याच्या या प्रवासात राष्ट्रीय सेविका समितीच्या माध्यमातून मावशी केळकर यांच्यापासून ते प्रमिलाताई मेढे यांसारख्या मातृत्ववान व्यक्तींची भूमिका कालातीत राहिली आहे.

संघाने वेळोवेळी राष्ट्रीय हिताचे असंख्य प्रश्न,मुद्दे समाजासमोर उपस्थित केले आहेत. या सर्वांना समाजाच्या विविध घटकांकडून सक्रिय पाठिंबा मिळाला आहे, ज्यात कधीकधी जाहीरपणे विरोध करणाऱ्यांचाही समावेश आहे. व्यापक हिंदू हिताच्या मुद्द्यांवर सर्वांचे सहकार्य मिळविण्यासाठी संघाने अविश्रांत प्रयत्न केले आहेत. असंख्य स्वयंसेवकांनी अनन्वित कष्ट सहन करून राष्ट्रीय एकता, सुरक्षा, सामाजिक सौहार्द, लोकशाही आणि धर्म संस्कृतीचे रक्षण करण्याच्या कामात आपले प्राणही अर्पण केले आहेत. या सगळ्यात समाजाच्या पाठिंब्याने नेहमीच महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

१९८१ मध्ये, तामिळनाडूतील मीनाक्षीपुरम येथे काही गरीब हिंदूंची दिशाभूल करून त्यांना धर्मांतरित करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. कर्णसिंह यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यावर हिंदू जागृती मोहिमेचा भाग म्हणून सुमारे पाच लाख लोक उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत प्रसिद्ध स्वामी चिन्मयानंद, मास्टर तारा सिंह, जैन मुनी सुशील कुमार जी, बौद्ध भिक्षू कुशोक बकुला आणि नामधारी शीख सद्गुरु जगजीत सिंह हे प्रमुख सहभागी होते.

“हिंदू शास्त्र आणि धर्मग्रंथांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नाही”. हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी श्री गुरुजी गोलवलकर यांच्या पुढाकाराने उडुपी येथे आयोजित केलेल्या विश्व हिंदू संमेलनात पूज्य धर्माचार्यांसहीत सर्व संत, महंत, आचार्या याची उपस्थिती आणि आशिर्वाद लाभले. ज्याप्रमाणे प्रयाग परिषदेने “न हिंदूः पतितो भवेत्” (कोणताही हिंदू पतित असू शकत नाही) हा ठराव स्वीकारला होता, त्याचप्रमाणे या परिषदेचा नारा होता “हिंदवाहः सोदारः सर्वे”. म्हणजेच सर्व हिंदू भारतमातेचे पुत्र आहेत. गोहत्याबंदी असो वा रामजन्मभूमी आंदोलन असो, संघाच्या स्वयंसेवकांना नेहमीच साधू-संतांचे आशीर्वाद लाभले आहेत.

स्वातंत्र्यानंतर लगेचच, जेव्हा तत्कालीन सरकारने राजकीय कारणांसाठी संघकार्यावर बंदी घातली तेव्हा संपूर्ण समाज संघाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. या अश्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संघाला आपला पाठिंबा दिला. आणीबाणी सारख्या भीषण संकटाच्या वेळीही असाच अनुभव आला. म्हणूनच, अनेक अडथळ्यांवर मात करून संघाचे कार्य अविरत आणि अक्ष्क्षुण पणे पुढे जात आहे. या सर्व परिस्थितीत आपल्या माता, भगिनींनी संघाचे कार्य,स्वयंसेवकांचा आधार देण्याची जबाबदारी अत्यंत कौशल्याने पार पाडली. या सर्व गोष्टी संघाच्या कार्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरल्या आहेत.

शताब्दी वर्षात, संघाचे स्वयंसेवक शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी, राष्ट्रसेवेत समाजाच्या सर्व घटकांचा सहकार्य,सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. आगामी वर्षभरात देशमरातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या खेड्या-पाड्यात आणि समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचणे हे प्राथमिक ध्येय असणार आहे. सज्जन शक्तीचे एकत्रित प्रयत्न देशाच्या सर्वांगीण विकासाचा यशस्वी प्रवास सुनिश्चित करतील.

( श्री दत्तात्रेय होसबाळे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह आहेत.)