RSS ला सत्तेची भूक नाही, मग संघाचं लक्ष्य तरी काय? मोहन भागवत यांच्याकडून मोठा खुलासा

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशमध्ये सध्याच्या परिस्थितीवर आणि संघाच्या उद्दिष्टावर होत असलेल्या चर्चांवर मत व्यक्त केले. संघाला सत्तेची भूक नाही, तर संघाचं मोठं लक्ष्य काय याविषयी त्यांनी खुलासा केला आहे.

RSS ला सत्तेची भूक नाही, मग संघाचं लक्ष्य तरी काय? मोहन भागवत यांच्याकडून मोठा खुलासा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 21, 2026 | 8:50 AM

RSS Chief Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशात मोठे वक्तव्य केले. शुक्रवारी त्यांनी मेरठ इथं खेळाडूंना संबोधित केले. संघाचा उद्देश राजकीय सत्ता प्राप्ती नाही. तर संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आणि व्यक्तीची चरित्र निर्मितीतून देशाला मजबूत करणे हा असल्याचे ते म्हणाले. मेरठमधील शताब्दी नगरातील माधव कुंज येथे देश-विदेशातील जवळपास 950 खेळाडूंशी संवाद साधला. भागवतांनी स्पष्ट सांगितले की, संघाला त्याचे नाव मोठे करायचे नाही तर राष्ट्राचे नाव मोठे करायचे आहे. संघ हा कोणत्याही सत्ता, स्पर्धा अथवा विरोधाच्या भावनेने प्रेरित नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. हिंदू समाजाचे संघटन आणि व्यक्ती निर्माण कार्य हाच संघाचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी मेरठमध्ये जवळपास 50 मिनिटांचं प्रबोधन केलं. भागवतांनी यावेळी संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला. तर तरुणांनी राष्ट्र निर्मिती कार्यात सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. कोणीही काहीही म्हणू द्या, संघ हा कोणत्याही समूहाविरोधात नाही अथवा स्पर्धेत नाही, तर सामाजिक एकता आणि सामाजिक एकजुटतेसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताला भौगोलिक सीमांमध्ये कसे बांधणार?

भारत काय आहे हे सांगताना, भारताला भौगोलिक सीमांमध्ये बांधता येणार नाही. भगवान राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद आणि महात्मा गांधींच्या परंपरेतून भारताचा आत्मा प्रेरणा घेतो असे ते म्हणाले. हिंदू शब्द हा विविधतेतून एकतेचे प्रतिक आहे. हे समूह वाचक अथवा जातीवाचक शब्द समुच्चय नाही. पूजा आणि पद्धती, देवी आणि देवता वेगवेगळे आहेत. पण या सर्वांचा सांस्कृतिक आधार एकता आणि समरसता हे आहे. जेव्हा जेव्हा सामाजिक एकता कमकुवत झाली आहे, तेव्हा तेव्हा राष्ट्रासमोर संकटं उभी राहिल्याचे ते म्हणाले.

सरसंघचालकांनी चार संस्कार, सनातन संस्कृती, धर्मभाव, सत्यनिष्ठेचा उल्लेख करत संघाचे संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करणे हेच एकमेव मिशन असल्याचे सांगितले. राष्ट्रहित हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात मेरठचं योगदान काय होतं, यावरही सरसंघचालकांनी विवेचन केलं.