कधी दहशतवादी समजून गोळ्या घालतात, आमच्या सारख्यांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकतात; संजय राऊतांचा मोदी सरकारवर आरोप

| Updated on: Dec 06, 2021 | 11:05 AM

आमच्या सारख्या लोकांच्या मागे सुद्धा सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून छळ केला जातो, अशा प्रकारे राज्य करण्याची विकृती वाढत चालली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कधी दहशतवादी समजून गोळ्या घालतात, आमच्या सारख्यांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकतात; संजय राऊतांचा मोदी सरकारवर आरोप
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेली शाईफेक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind ) यांची रायगड भेट, नागालँडमध्ये दहशतवादी समजून मजुरांना घातलेल्या गोळ्या आणि सावरकरांच्या मुद्यावर भाष्य केलं. नागालँडच्या प्रकरणावर सरकारनं माफी मागितली आहे. कधी कुणाला दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात तर कधी आमच्यासारख्या लोकांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये टाकले जातं. आमच्यावर फक्त गोळ्या घालत नाहीत एवढंच, असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्या सारख्या लोकांच्या मागे सुद्धा सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून छळ केला जातो, अशा प्रकारे राज्य करण्याची विकृती वाढत चालली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कुबेर यांच्यावरील शाई फेकीचा निषेध

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात ज्या प्रकारचं कृत्य झालं त्याचा आम्ही निषेध केलेला आहे, असं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष महाराष्ट्रानं देशाला दिलेले आहेत. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यवधी लोकांच्या भावना युगपुरुषांशी जोडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली. जेम्स लेनच्या लेखनावरुन राज्यात आणि देशात वादळ उठलं होतं. आपण कितीही हुशार असलो, विद्वान असलो तरी भान असलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असंही ते म्हणाले.

राष्ट्रपतींची रायगड भेट अभिमानास्पद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं हे आमच्यासाठी अभिमानाचं आहे. संभाजी छत्रपती यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल अभिनंदन करतो, असं संजय राऊत म्हणाले.

मागच्या अधिवेशनातील शिक्षा पुढच्या अधिवेशनात कशी

राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन हे बेकायदेशीर आहे. तीन महिन्यानंतर पुढच्या अधिवेशनात शिक्षा देणं हे कोणत्या नियमात बसतं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजपला सावरकरांचं शौर्य दिसत नाही का?

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक सावरकरांबद्दल प्रेम आणि सद्भाव ठेवतो. शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये सावरकरांवर केलेलं पहिलं भाषण नाही. त्यांनी बारामतीतही विद्वतापूर्ण भाषण केलं होतं. भाजपला सावरकरांचा शौर्य का दिसत नाही. त्यांना ते भारतरत्न का देत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

इतर बातम्या:

यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबाच्या नवरात्राला उत्साहात सुरुवात, साताऱ्यात पहिल्याच दिवशी 12 हजारांवर भाविकांनी घेतले दर्शन

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल चैत्यभूमीवर, अजित पवार, आदित्य ठाकरेंचीही हजेरी, दादा म्हणतात

Sanjay Raut slam BJP Government over Political use of various agencies against Political Parties