‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या

| Updated on: Jan 29, 2021 | 8:53 PM

"राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत", असा घणाघात इराणी यांनी केला (Smriti Irani slams Rahul Gandhi).

राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही, स्मृती इराणी भडकल्या
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी स्मृती ईराणींचे महत्त्वपूर्ण आवाहन
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सराकरवर सडकून टीका केली. या टीकेला केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसेचं रुप आल्यानंतर अनेक पोलीस, मीडियाकर्मी जखमी झाले. मात्र, त्यांच्याप्रती गांधींनी एकही सहानुभूतीचा शब्द वापरला नाही”, असा घणाघात इराणी यांनी केला (Smriti Irani slams Rahul Gandhi).

“भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका काँग्रेस नेत्याने शांततेची विनंती करण्याऐवजी हिंसा करण्याचं वक्तव्य केलं आहे. 26 जानेवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय काही पत्रकारही जखमी झाले आहेत. अनेक महिला पोलिसांवर हल्ला झाला. मीडियाकर्मींवर हल्ला झाला. त्यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याप्रती राहुल गांधी यांच्या तोंडातून एकही संवेदशील शब्द निघाला नाही”, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

“राहुल गांधी देश तोडण्याची भाषा केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, 26 जानेवारीला जो हिंसा दिल्लीत बघायला मिळाली तसाच हिंसा देशातील इतर भागांमध्ये जनता बघेल. मी देशाला विनंती करते, राहुल गांधींच्या या इच्छेला आपण सर्व मिळून अपयशी ठरवू”, असं इराणी म्हणाल्या.

“राहुल गांधी हिंसा पसरवण्यासाठी कशाप्रकारे योजना केली आहे, याची आम्हाला माहिती आहे. खरंतर MSP चं सर्वात व्यापक ऑपरेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालं. कृषी उत्पन्न बाजार समितीला आणखी बळकट करण्याचं ध्येय आहे. राष्ट्रपतींनी आजच्या अभिभाषणातही याबाबत भाष्य केलंय”, असं त्यांनी सांगितलं.

“राहुल गांधी यांच्याकडे अपूर्ण माहिती आहे. त्यांच्याकडे इतकी अपूर्ण माहिती आहे की, ते बॉर्डरचं नावही बदलतात. संपूर्ण देशात आग लावण्याचा त्यांचा मनसूबा होता. मात्र, आम्ही त्याचं खंडन करतो”, असा आरोप त्यांनी केला (Smriti Irani slams Rahul Gandhi).

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

“आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्ही एक इंचही मागे हटू नका. कारण यामागे तुमचं भविष्य अवलंबून आहे. हे जे 5-10 लोकं तुमचं भविष्य चोरी करु पाहत आहेत, त्यांना ते चोरु देऊ नका. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करु”, असं आश्वासन आणि आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

“शेतकरी आंदोलनासोबत काय सुरु आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरंतर नव्या कृषी कायद्यांमुळे काय नुकसान होईल, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समित्या संपतील, MSP नष्ट होईल. खरंतर सरकार शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. परिणामी देशात महागाई वाढेल आणि आपण मजबूर होऊ”, असं राहुल गांधी म्हणाले.

“शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिले? गृहमंत्री याची जबाबादारी घेत नाहीत, याबाबतस गृहमंत्रींना विचारलं पाहिजे. आता शेतकऱ्यांसोबत अत्याचार होत आहे. सरकार त्यांच्यासोबत बातचित करण्याऐवजी त्यांना मारत आहे. NIA ची धमकी देत आहे. सरकाला लवकरच या विषयावर शेतकऱ्यांशी चर्चा करुन कायदे रद्द करायला हवे”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : जेव्हा मुख्यमंत्री ठाकरे फडणवीस सरकारची स्तुती करतात