सुब्रमण्यम स्वामी यांचे मतही लक्षात घ्यावं; अनिल देसाई असं का म्हणालेत?

सुब्रमण्यम स्वामी हे अर्थतज्ज्ञ आहेत. बराच काळ त्यांनी राजकारणात घालवला आहे. बऱ्याच विषयांवर सखोल अभ्यास करून बोलणारे आहेत. त्यांचही मत लक्षात घेतलं पाहिजे, असंही अनिल देसाई म्हणालेत.

सुब्रमण्यम स्वामी यांचे मतही लक्षात घ्यावं; अनिल देसाई असं का म्हणालेत?
अनिल देसाई
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 21, 2023 | 10:42 AM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू होत आहे. सलग ३ दिवस दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू राहणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होणार आहे. राज्यपालांच्या अधिकाराचीही तपासणी व्हावी, असं मत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलं. यासंदर्भात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या भूमिकेत विसंगती असल्याचंही ते म्हणाले. अनिल देसाई यांनी सांगितलं की, २० जूननंतर २१ जूनपासून ज्या घटना घडल्या आहेत या घटनांचा क्रम बघा. यातून कायद्याच्या दृष्टिकोणातून कशी प्रत्येक सदस्यावर कारवाई होऊ शकते. हे बघणं आवश्यक आहे. संविधानाला धरून काय करता येईल. पक्षविरोधातील कारवाई होते का, याचा विचार करावा लागेल.

पक्षाच्या विरोधातील केलेलं काम होत आहे का. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सोडल्यासारखं होतं का? व्हीप कोणाचा लागू व्हायला हवा. राज्यपालांचं वर्तन कसं होतं. जे काही केलं ते त्यांच्या अधिकारात होत का? राज्यपालांचं वर्तन योग्य होतं का? माहिती अधिकारात मागितलेली माहिती नीटपणे मिळालेली नाही. अशा बऱ्याच गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत.

खटाटोप का करायला लावला?

संविधानाचा मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. तो पेच व्यवस्थितरीत्या उत्तर द्या. लोकशाहीला वाचवा, असं आमचं मत आहे, असं आवाहन त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केलं. निवडणूक आयोगानं काही गोष्टी स्वतःहून मागितल्या होत्या. विशिष्ट नमुन्यामध्ये दिल्या होत्या. वैयक्तिक अॅफिडेव्हीट होते. हा सगळा खटाटोप का करायला लावला, असा सवाल अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला केला.

निवडणूक आयोगाचा विसंगत निकाल

निवडणूक आयोगात संघटनात्मक बाजू बघीतली गेली नाही. विसंगत असा निकाल दिला आहे. कुणाच्याही सद्सदविवेकबुद्धीला चॅलेंज करणारा असा हा निकाल आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा धक्कादायक होता. हा निकाल सुनावणीदरम्यान येऊ नये. सर्वोच्च न्यायालयासमोर असलेल्या केससंदर्भात याचा विपरित परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही अनिल देसाई यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयासमोर एक क्रम असतो. सर्वोच्च न्यायालयासमोर वेगवेगळ्या संघटनांच्या केसेस असतात. त्यांनी नकार दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं नंबरींग केलेलं आहे, असंही अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं.

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्वीट काय?

सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे खासदार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ट्वीट केले आहे. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचं ट्वीट त्यांनी केलं. सुब्रमण्यम स्वामी हे अर्थतज्ज्ञ आहेत. बराच काळ त्यांनी राजकारणात घालवला आहे. बऱ्याच विषयांवर सखोल अभ्यास करून बोलणारे आहेत. त्यांचही मत लक्षात घेतलं पाहिजे, असंही अनिल देसाई म्हणालेत.

Follow Us