सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 23, 2023 | 11:50 AM

सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात? असं वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?
Follow us on

सुरत : चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. कोर्टाने जामीन दिल्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने आज त्यावर निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. त्यानंतर 20 मिनिटात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. सुनावणीच्यावेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात हजर होते. यावेळी गुजरातमधील काँग्रेसचे अनेक बडे नेतेही कोर्ट परिसरात उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

माझा हेतू चुकीचा नव्हता

यावेळी राहुल गांधी यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. माझा हेतू चुकीचा नव्हता. मी जे बोललो ते केवळ एक राजकारणी म्हणून बोललो. मी नेहमीच देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आला आहे, असं राहुल गांधी यांनी कोर्टाला सांगितलं. राहुल गांधी यांच्या विधानाने कुणाचंही नुकसान झालेलं नाही. अशावेळी या प्रकरणात कमी शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलाने कोर्टाला केली होती.

तर राहुल गांधी यांना कठोर शिक्षा सुनावली पाहिजे, तसेच त्यांना दंडही ठोठावला पाहिजे, अशी मागणी पूर्णेश मोदी यांच्या वकिलाने कोर्टाला केली होती. त्यानंतर हा निर्णय आला. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. त्यांना जामीनही मिळाला. आता ते वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहेत, असं त्यांच्या वकिलाने सांगितलं.

काय आहे प्रकरण?

2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची कर्नाटकात मोठी रॅली होती. 13 एप्रिल 2019 रोजी कोलार येथे ही रॅली पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एक सारखं कसे? सर्व चोरांची आडनावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

त्यावर भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मोदी समुदायाचा अपमान झाला आहे. त्यांच्या विधानामुळे मोदी समुदायातील लोकांना मान खाली घालावी लागत आहे, असं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं होतं.