
सध्या देशात सर्वत्र तापमान वाढले आहे. अनेक शहरांमधील पारा 45 अंशाचा वर गेला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील तापमान 47 डिग्री सेल्सियसवर गेले आहे. तापमानामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. या तापमानाचा फटका मालगाडीमधील लोको पायलटला बसला. इंजिनमधील तापमान 55 डिग्री सेल्सियसवर गेल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. या तापमानात सतत 9 तास काम केल्यानंतर लोको पायलट विनोद कुमार महोबा यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलटी आणि चक्कर आले. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशनवर अडीच तास मालगाडी थांबून होती.
लोको पायलटची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे महोबा स्टेशनवर मालगाडी अडीच तास थांबली होती. दुसरा लोका पायलट आल्यानंतर गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. ही मालगाडी झाशीवरुन निघाली होती. ती बांदा येथे जात होती. मालगाडीच्या इंजिनमधील तापमान 55 डिग्रीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. सोबत असणारे लोको पायलट गगन सैनी याने सांगितले की, उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी विनोद कुमार हे दहा लिटर पाणी पिऊन गेले होते. त्यानंतर त्यांना उन्हाचा फटका बसला.
मालगाडी महोबा स्टेशनच्या आधी कुलपहाड स्टेशनवर असताना विनोद कुमार यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सैनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैनी यांना कोणत्याही परिस्थितीत मालगाडी महोबा स्टेशनवर आणण्याचे सांगितले. सैनी यांनी त्या परिस्थितीत गाडी महोबा स्टेशनवर आणली. त्यानंतर विनोद कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
देशात सर्वत्र तीव्र उष्ण वारे वाहत आहे. राजस्थानमधील तापमान ५० अंश सेल्सियसवर गेले आहे. दिल्लीच्या तापमानाने उच्चांक गाठला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४५ अंशावर आहे. यामुळे या भागात जमावबंदी लागू केली आहे.