
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही दिवसांपूर्वी मोठा तणाव निर्माण झाला होता. याच तणावातून दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले होते. सध्या मात्र भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. असे असतानाच आता सैन्यदलात महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या एका माजी अधिकाऱ्याने मोठं भाकीत केलं आहे. आगामी पाच ते दहा वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा युद्ध होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या युद्धासाठी चीनदेखील जबाबदार असण्याची शक्यताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
माजी लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी ‘द प्रिंट’मध्ये एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाबाबत भाष्य केलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील ताज्या संघर्षामध्ये चीनने पाकिस्तानला उघड समर्थन दिले होते. भारतावर हल्ले करताना पाकिस्तानने चीनची शस्त्रं वापरली होती. त्यामुळेच चीनच्या मदतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकतं असं लेफ्टनंट जनरल एचएस पनाग यांनी म्हटलंय.
“चीन गेल्या बराच काळापासून चीन हा भारताच्या प्रमुख विरोधी देशांपैकी एक आहे. पाकिस्तान तर आपल्याला त्रास देणाऱ्या देशांपैकी एक आहे. चीनच्या पाठिंब्यामुळे आगामी काही काळात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष होऊ शकतो. माझ्या मतानुसार आगामी पाच ते दहा वर्षांत असाच संघर्ष पुन्हा होऊ शकतो. भारताला पाकिस्तानला आणखी एकदा पराभूत करायचे असेल आणि चीनलाही रोखून धरायचे असेल तर भारताने आपली लष्करी क्षमता वाढवली पाहिजे,” असे पनाग यांनी आपल्या या लेखात म्हटले आहे.
पाकिस्तानवर सैन्याच्या बाबतीत मात करायची असेल तसेच चीनला अडथळा निर्माण करायचा असेल तर सैन्यदामध्येही काही मूलभूत बदल करणे ही अपरिहार्य अशी गरज आहे. त्यासाठी आपल्या संरक्षण विषयक बजेटमध्ये दुपटीने वाढ करावी लागेल. तसेच आपल्या जीडीपीच्या चार टक्के खर्च हा संरक्षणावर करावा लागेल, असे मतही लेफ्टनंट जनरल पनान यांनी व्यक्त केले.