कमालच झाली… ज्योतिषालाही कळलं नाही त्याचं भविष्य, अवघ्या 24 तासात पद गेलं; मुख्यमंत्री विजय यांचा यूटर्न
Tamil Nadu Politics : तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांनी त्यांचे ज्योतिषी पंडित रिकी राधा वेत्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) म्हणून नियुक्ती केली होती, मात्र आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून तामिळनाडूचे राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांनी त्यांचे ज्योतिषी पंडित रिकी राधा वेत्रीवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) म्हणून नियुक्ती केली होती.मात्र, या नियुक्तीनंतर लगेचच वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या निर्णयावर टीका केली होती. आता या नियुक्तीच्या अवघ्या 24 तासांच्या आत त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रिकी राधा यांना पदावरुन हटवलं
तामिळनाडू सरकारच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या पत्रात पंडित रिकी राधा यांची OSD पदावरील नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कार मंगळवारी मुख्यमंत्री विजय यांनी या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला. व्हिसीके, CPI(M) आणि CPI या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांनी या निर्णयावर टीका केली होती, त्यानंतर आता मुख्यमंत्री विजय यांनी पंडित रिकी राधा यांना पदावरून हटवले आहे.
बुधवारी विधानसभा फ्लोअर टेस्टपूर्वी VCK च्या आमदार वाणी अरसु यांनी सरकारला वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचारसरणीवर भर देण्याचे आवाहन केले. अंधश्रद्धा मानल्या जाणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचीही त्यांनी सूचना केली. त्या म्हणाल्या की, आपल्या सरकारने ज्योतिषावर नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास ठेवायला हवा.’
विजय यांचे सरकारने सिद्ध केले बहुमत
थलापती विजय यांच्या सरकारने तमिळनाडू विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. बहुमत चाचणीपूर्वी मंत्री निर्मल कुमार यांनी सांगितले की, ‘पंडित रिकी राधा आमच्या पक्षाचे प्रवक्ते राहिले आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे ज्योतिषी असणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. कोणालाही OSD बनवता येऊ शकते.’
अनेक पक्षांनी केली होती टीका
याआधी CPI(M) चे राज्य सचिव पी. शनमुगम यांनीही या नियुक्तीवर टीका केली होती. वैज्ञानिक विचारसरणी आणि विवेकबुद्धीला प्रोत्साहन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारी खर्चातून एखाद्या ज्योतिषाला सरकारी पद देणे म्हणजे अंधश्रद्धेला चालना देणे होय, असे त्यांनी म्हटले. तर एआयडीएमकेचे खासदार आयएस ईनाबदुरई यांनी सरकारला टोला लगावत म्हटले की, ‘इतरांचे भविष्य सांगणारे पंडित रिकी राधा स्वतःचे भविष्यच पाहू शकले नाहीत. विजय सरकारचे वाईट दिवस सुरू झाले आहेत.’