मेघालयाचे मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष; पी. ए. संगमा यांना आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी का सोडावी लागली?

| Updated on: Mar 04, 2022 | 5:40 AM

पी. ए. संगमा अर्थात पुर्नों अगिटोक संगमा यांचा आज स्मृती दिन. पी. ए. संगमा हे आधी काँग्रेसचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते तब्बल आठवेळा लोकसभा सदस्य राहिले. तसेच ते काही काळ मेघालयाचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष देखील होते.

मेघालयाचे मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष; पी. ए. संगमा यांना आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी का सोडावी लागली?
Follow us on

पी. ए. संगमा (P. A. Sangma) अर्थात पुर्नों अगिटोक संगमा यांचा आज स्मृती दिन. पी. ए. संगमा हे आधी काँग्रेसचे (Congress) सदस्य होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश (ncp) केला. संगमा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध असतानाही स्वतःला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले. म्हणून त्यांना राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आले. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाच्या पक्षाची स्थापना केली. पी. ए. संगमा तब्बल आठ वेळा निवडून येत लोकसभा सदस्य झाले. त्यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. मात्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय संगमा यांना फारसा मानवला नाही असेच म्हणावे लागेल. राष्ट्रपती पदावरून त्यांचे पक्षासोबत मतभेद झाले आणि ते पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाच्या पक्षाची स्थापना केली. मात्र हा पक्ष फारसा यशस्वी होऊ शकला नाही.

संगमा यांचा जीवन परिचय

पी. ए. संगमा यांचा जन्म एक सप्टेंबर 1947 रोजी मेघालय राज्यातील चपाथी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे बालपण गावातच गेले, त्यानंतर त्यांनी शिलॉंगमधील सेंट अँथनी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी आसामला गेले. त्यांनी आसामच्या डिब्रूगढ विश्वविद्यालयामधून अंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण देखील पूर्ण केले. ते 1973 साली प्रदेश युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. ते युवक काँग्रेस समितीचे महासचिव देखील झाले. 1975 ते 1980 या काळात ते युवक काँग्रेसचे महासचिव होते.

संगमा यांचा राजकीय प्रवास

प्रदेश काँग्रेसमध्ये केलेल्या चांगल्या कामांची पोहोचपावती म्हणून त्यांना 1977 साली काँग्रेसच्या वतीने तुरा मतदारसंघातून लोकसभेचे तिकिट देण्यात आले. इथे देखील त्यांनी पक्षाची निराशा केली नाही. ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते सातत्याने याच मतदारसंघातून विजयी होत राहिले. ते तब्बल आठवेळा एकाच मतदार संघातून विजयी झाले. 1980-1988 या काळात काँग्रेसकडून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी सोपवण्यात आली. संगम यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर 1988 ते 1991 या काळात ते मेघालयाचे मुख्यमंत्री देखील होते. 1996 साली लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी शरद पवार आणि तारिक अन्वर यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. मात्र त्यानंतर झालेल्या मतभेदामुळे ते राष्ट्रवादीतून देखील बाहेर पडले. पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली. 2012 साली ते प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. मात्र जवळपास सर्वच पक्षांचे प्रणव मुखर्जी यांना समर्थ असल्याने या निवडणुकीत संगमा पराभूत झाले. ते अखेरपर्यंत राजकारणात सक्रीय होते. चार मार्च 2016 रोजी त्यांची प्राणज्योत मालावली.

संबंधित बातम्या

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन शिवसेनेत, मुंबईत समर्थकांसह प्रवेश सोहळा

Russia Ukrane War : रशियाशी चर्चेला युक्रेनचा नकार, युद्धाची धग आणखी वाढणार

नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला, मलिकांना 7 मार्चपर्यंत कोठडीच