मोठी बातमी! देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे

ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. या संपाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर पडला. या संपाचा थेट परिणाम हा पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर यांच्या वाहतुकीवर पडला. त्यामुळे देशभरात मोठा हल्लकल्लोळ माजला होता.

मोठी बातमी! देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे
| Updated on: Jan 02, 2024 | 10:16 PM

मुंबई | 2 जानेवारी 2024 : ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक संपली आहे. हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाहीय. ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय. हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात मोठा फटका सहन करावा लागला. या संपामुळे आज दिवसभर आणि काल संध्याकाळपासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली. या संपामुळे आज सकाळी भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक खूप अडचणीत सापडले होते. अखेर केंद्र सरकारचं आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रक चालकांच्या या संपाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडला. कुठे पेट्रोल होतं तर कुठे नाही, कुठे भाजीपाला मिळाला तर कुठे नाही, कुठे डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका चालू शकल्या नाहीत. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला. भाजीपाला आणि शेतमालाची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी लिलाव ठप्प झाला. इंधन नसल्याने नागपुरात रुग्णालयाबाहेर अनेक रुग्णवाहिका उभ्या राहिल्या. डिझेल न मिळाल्यास खासगी शाळांच्या बसेसची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. इंधन तुटवड्यामुळे एसटी वाहतुकीलादेखील फटका बसण्याची शक्यता होती.

ट्रक चालकांच्या संपाचं कारण काय?

याआधी स्वतःची चूक असूनही एखादा ट्रकचालक वाहन किंवा व्यक्तीला धडक देऊन पळून गेला, तर त्याला ३ वर्षांची कैद होती. नव्या कायद्यात १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला गेलाय. सरकार म्हणतंय की ट्रकचालकानं एखाद्याला धडक दिल्यास त्याला रुग्णालयात नेणं गरजेचं आहे, पण तो पळून जात असेल तर दंडात्मक कारवाई योग्यच ठरते. ट्रकचालक म्हणतायत की अनेकदा चूक नसतानाही आम्हाला पळून जावं लागतं, कारण अपघातानंतर जमलेला जमावाकडून मारहाणीची भीती असते. सरकार म्हणतं की ट्रक अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे, म्हणून कठोर नियम बनवणं योग्य. चालक म्हणतायत की हेतू चांगला आहे, मात्र अपघातात चूक कुणाची हे शोधण्याची यंत्रणाच नाही, अनेक अपघातात कायम मोठ्या वाहनाची चूक धरली जाते.

Follow Us