शहाजहाँपूर बॉर्डरवर धुमश्चक्री; शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या

| Updated on: Jan 03, 2021 | 8:18 PM

अलवर जिल्ह्यातील शाहजहापूर हरियाणा बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी लाठीचार्ज केलाय.

शहाजहाँपूर बॉर्डरवर धुमश्चक्री; शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Follow us on

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना उलटून गेलाय. त्यातच आज (3 जानेवारी) अलवर जिल्ह्यातील शाहजहापूर हरियाणा बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. आंदोलक शेतकरी हरियाणात प्रवेश करत असताना पोलिसांनी विरोध केल्याने झटापट झाली आणि आंदोलन चिघळलं. यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या (Use of lathi charge and tear gas on farmer protest by Haryana police).

शाहजहापूर सीमेवर आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर वाहनांच्या 5 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. सध्या सर्वच आंदोलनकर्त्यांना हरियाणातील धारूहेडाजवळ रोखण्यात आलंय. हे सर्व शेतकरी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात होते. ते हरियाणामार्गे दिल्लीला पोहचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हरियाणा पोलिसांनी त्यांना रोखले.

याआधी गुरुवारी देखील राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या एका गटाने राजस्थान-हरियाणाच्या शाहजहापूर सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केला. जवळपास 10-12 ट्रॅक्टरने हरियाणा पोलिसांची बॅरिकेडिंग तोडत हरियाणात प्रवेश केला होता आणि दिल्लीकडे रवाना झाले होते. शेतकरी आणि पोलिसांमधील संघर्षादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पाण्याच्या फवाऱ्यांचाही उपयोग केला. याशिवाय लाठीचार्जही झाला. मात्र, आंदोलक शेतकरी डगमगले नाहीत.

दिल्लीतील पावसाने आंदोलक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक महिन्यापेक्षा जास्तचा काळ झालाय. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीचं आव्हान असतानाच आता दिल्लीत पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालीय. कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर असलेल्या शेतकऱ्यांना आता पावासाचाही सामना करावा लागत आहे. आंदोलनाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याचं दिसत आहे.

यावर बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे नेते म्हणाले, “शेतकऱ्यांचे तंबू थंडी आणि साठलेल्या पाण्यापासून बचाव करु शकत नाही. पावसामुळे आंदोलनस्थळी परिस्थिती खूप खराब झालीय. पावसानंतर थंडीही खूप वाढलीय. मात्र, सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचं दिसतंय.”

हेही वाचा :

दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा 37 वा दिवस; नववर्षानिमित्त शेतकऱ्यांनी काय केलं?

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 7 वी बैठक संपली, अद्यापही तोडगा नाहीच

मोदी सरकार अंबानी, अदानींसारख्या मक्तेदारांच्या हितासाठी कार्यरत : विश्वास उटगी

Use of lathi charge and tear gas on farmer protest by Haryana police