Video : होळीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उत्तराखंडमध्ये पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका!

| Updated on: Mar 28, 2021 | 4:57 PM

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी खास पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. यावेळी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडलं. तसंच फुलांची उधळणही करण्यात आली.

Video : होळीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उत्तराखंडमध्ये पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली
Follow us on

देहरादुन : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशा स्थितीत विविध राज्यात होळी सण साजरा करण्याबाबत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे होळी सणावर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी खास पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. यावेळी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडलं. तसंच फुलांची उधळणही करण्यात आली.(Bhagat Singh Koshyari celebrated Holi in a traditional manner at his residence in Uttarakhand)

“आपला गृह प्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये होल्यारो यांचं निवासस्थानी स्वागत केलं आणि कुमाऊँनी खडी होलीमध्ये सहभाग घेतला”, असं ट्वीट भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करताना आणि टाळी वाजवून वाद्यांना साथ देताना कोश्यारी दिसून आले. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली.

राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार वाद

राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद ठाकरे सरकारच्या पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधीदरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा 12 आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

1. पहाटेचा शपथविधी, राष्ट्रपती राजवट रातोरात हटवली

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रातोरात हटवत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पहाटे शपथ दिल्यानंतर राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात वादाची नांदी झाली. त्यानंतर अडीच दिवसात जे घडलं, ते उभ्या महाराष्ट्रानेच नाही, तर देशाने पाहिलं आहे.

2. उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना विधानसभा किंवा परिषद या दोन सभागृहांपैकी एका ठिकाणी सहा महिन्यांच्या आत निवडून येणे संविधानिकदृष्ट्या अनिवार्य होते. मात्र राज्यपालांनी त्यांची नियुक्ती रखडवली होती. राज्यातील अनिश्चितता संपुष्टात आणण्याचं कारण सांगत राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.

3. सरपंचपदावरुन वाद

जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढावा, ही ठाकरे सरकारने केलेली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळली होती. ग्रामविकास विभागाने अध्यादेश जारी करण्याबाबतचा प्रस्ताव राजभवनाला सादर केला. परंतु राज्यपालांनी अध्यादेश काढण्यास नकार दिला. अध्यादेशापेक्षा विधीमंडळात ठराव मांडण्याचा सल्ला कोश्यारींनी राज्य सरकारला दिला

4. विधानपरिषद आमदारांची नियुक्ती रखडली

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल कोट्यातील विधानपरिषदेवरील 12 आमदारांची नियुक्ती अजूनही रखडलेलीच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी नोव्हेंबर महिन्यातच प्रत्येकी चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र अद्यापही राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

5. मंदिरं उघडण्यावरुन वाद

लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली मंदिरं उघडण्याच्या मागणीसह विरोधी पक्ष भाजपने राज्यभर आंदोलन केलं होतं. हे सुरु असताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्द्याची आठवण करुन दिली होती

6. मुंबई विद्यापीठाचं काम ‘IIFCL’ला देण्यावरुन वाद

आयआयएफसीएल (IIFCL) कंपनीला काम देण्याच्या प्रस्तावावरुन सध्या मुंबई विद्यापीठात राज्यपाल विरुद्ध युवासेना संघर्ष पेटला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कंपनीला काम देण्याबाबत शिफारस केली होती. कुलगुरुंनी हा प्रस्ताव पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला. मात्र युवासेना सिनेट सदस्यांसह अन्य सदस्यांच्या विरोधामुळे कंपनीला काम देण्याबाबत कुठलाही निर्णय सभेत होऊ शकला नाही. IIFCL कंपनीलाच काम देण्याचा आग्रह का? असा सवाल युवासेनेने केला आहे.

7. हवाई प्रवासाला परवानगी नाकारली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

संबंधित बातम्या :

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार

“आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा कोश्यारींना टोला

Bhagat Singh Koshyari celebrated Holi in a traditional manner at his residence in Uttarakhand