आता वंचितानाही लाभ होणार… दोन्ही सभागृहात वक्फ विधेयक मंजूर होताच मोदींची प्रतिक्रिया

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. हे विधेयक वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी आणेल, ज्यामुळे मुस्लिम महिला आणि गरीबांना फायदा होईल, असं मोदींनी म्हटलं आहे.

आता वंचितानाही लाभ होणार... दोन्ही सभागृहात वक्फ विधेयक मंजूर होताच मोदींची प्रतिक्रिया
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 12:38 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हे आभार मानले आहेत. या चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व खासदारांचे आभार. ज्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि हा कायदा मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं त्या सर्वांचे आभार. संसदीय समितीला आपले अमूल्य संदेश पाठवणाऱ्या अगणित लोकांचेही विशेष आभार. पुन्हा एकदा व्यापक चर्चा आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित झालं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक दशकांपासून वक्फ प्रणालीत पारदर्शिकतेचा अभाव होता. त्यामुळे विशेष करून मुस्लिम महिला, गरीब मुसलमान आणि पसमांदा मुसलमानांच्या हिताचं त्यामुळे मोठं नुकसान व्हायचं. आता संसदेने पारित केलेल्या कायद्यामुळे पारदर्शिकता वाढणार आहे. तसेच लोकांच्या अधिकारांचं रक्षणही केलं जाणार आहे. हा सामाजिक आणि आर्थिक न्याय, पारदर्शकची महत्त्वाची लक्षणे आहेत. बऱ्याच काळापासून वंचित राहिलेल्यांना आता मदत मिळणार आहे. वक्फ बिलामुळे लोकांना संधी मिळणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं आहे. 12 तासाच्या जंबो चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर विधेयकाच्या विरोधात 232 मते पडली. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर दीर्घ चर्चा झाली. तब्बल 13 तास राज्यसभेत चर्चा झाल्यानंतर राज्यसभेतही हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर कायदा अस्तित्वात येणार आहे.

नवी पहाट

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक म्हणजे एक नवीन पहाट आहे. राज्यसभेतही वक्फ बिलावर चर्चा झाल्यावर त्यांनी हे विधेयक आजची गरज असल्याचं म्हटलं होतं. या विधेयकामुळे पारदर्शिकता येणार आहे. तसेच जबाबदारीही येणार आहे. या विधेयकाचं नाव उम्मीद असं आहे. उम्मीद या नावाला कुणाचा आक्षेप असू नये. हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

एक कोटीहून अधिक लोकांच्या सूचना

आम्ही चांगला हेतू ठेवून हे विधेयक आणलं आहे. जेपीसीत वक्फ बिलावर विस्ताराने चर्चा झाली. 10 शहरात जाऊन विधेयकावर मते घेण्यात आली. सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर विधेयक तयार करण्यात आलं आहे. एक कोटीहून अधिक लोकांनी या विधेयकावर हरकती आणि सूचना दिल्या आहेत. वक्फच्या संपत्तीबाबत सातत्याने वाद असतात. त्यामुळे हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे. या विधेयकासाठी आम्ही 284 संघटनांशी चर्चा केली. वक्फ संपत्तीशी निगडीत असंख्य केसेस पेंडिंग आहेत. काँग्रेसला जे करता आलं नाही, ते मोदी सरकारने करून दाखवलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

जुन्या विधेयकात काय होतं?

वाद असेल तर फक्त ट्रिब्यूनलमध्ये निर्णय व्हायचा

वक्फ ट्रिब्यूनलच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं

ज्या संपत्तीवर वक्फने दावा केला, ती त्यांची होईल

वादग्रस्त संपत्तीवरही वक्फ दावा करू शकतो

धार्मिक कार्यासाठी वापरलेली जमीन वक्फची असेल

नव्या विधेयकात काय?

आता वादावर डीएम रँकचे अधिकारी निर्णय देतील

वक्फ ट्रिब्यूनलच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं

सरकारी संपत्तीवर वक्फचा दावा असणार नाही

आता वादग्रस्त संपत्तीवर वक्फचा दावा असणार नाही

जोपर्यंत मालमत्ता दान होत नाही, तोपर्यंत ती वक्फची नसेल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us