PM Modi in Kolkata: भाजपची सत्ता आल्यास बंगालचा चेहरामोहराच बदलू; पंतप्रधानांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

| Updated on: Mar 07, 2021 | 3:57 PM

स्वातंत्र्यानंतर बंगालकडून जे जे हिसकावले गेले आहे, ते ते परत मिळवून देऊ. तसेच 'सिटी ऑफ जॉय' अशी ओळख असलेल्या पश्चिम बंगालला 'सिटी ऑफ फ्युचर' बनवू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, | PM Modi rally in Kolkata

PM Modi in Kolkata: भाजपची सत्ता आल्यास बंगालचा चेहरामोहराच बदलू; पंतप्रधानांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये अस्सल परिवर्तन करुन दाखवू. स्वातंत्र्यानंतर बंगालकडून जे जे हिसकावले गेले आहे, ते ते परत मिळवून देऊ. तसेच ‘सिटी ऑफ जॉय’ अशी ओळख असलेल्या पश्चिम बंगालला ‘सिटी ऑफ फ्युचर’ बनवू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या जनतेला दिले. (PM Narendra Modi in Kolkata rally)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

1. पंतप्रधान मोदी यांच्या बंगालमधील या पहिल्या प्रचारसभेसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली होती. हाच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आज ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये उभं राहायलाही जागा नाही, रस्तेही गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे विरोधकांना आजच 2 मे (निकालाचा दिवस) असल्याचा भास होत आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी हाणला.

2. ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. मात्र, भाजपची सत्ता आल्यास बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करुन स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य दिले जाईल. तसेच पश्चिम बंगालमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल. सध्या ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे’ असे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

3. मी फक्त माझ्या मित्रांसाठी काम करतो, असा आरोप विरोधक माझ्यावर करतात. लहानपणी आपण ज्यांच्यासोबत खेळतो, मोठे होतो, त्यांच्याशी आपली पक्की मैत्री होते. मी देखील लहानपणी गरिबीत वाढलो आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील गरीब माणसाचं दु:ख मी जाणू शकतो. त्यामुळे मी माझ्या याच मित्रांसाठी काम करत राहीन. मला पश्चिम बंगालमधील माझ्या मित्रांसाठी काम करायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

4. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पश्चिम बंगालकडून जे हिसकावून घेतलंय ते मी परत करेन, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. बंगालच्या वाटचालीच्यादृष्टीने पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत. याची पायाभरणी पुढील पाच वर्षांमध्ये होईल. मतदान करताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा बंगाल हे देशाचे नेतृत्त्व करणारे राज्य असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

5. अलीकडेच देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर झाली. यामध्ये पश्चिम बंगालचा समावेश नव्हता. पश्चिम बंगालच्या जनतेला या यादीत आपल्या राज्यातील शहरांचेही नाव यावे, असे वाटते. पश्चिम बंगालमध्ये सर्वकाही आहे. फक्त चांगल्या वृत्तीने पुढे काम करत राहिले पाहिजे. आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास ‘सिटी ऑफ जॉय’ असणाऱ्या पश्चिम बंगालला ‘सिटी ऑफ फ्युचर’ बनवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

6. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला. बंगालमध्ये परिवर्तन होईल, या आशेने जनतेने त्यांना सत्ता दिली. पण तृणमूल काँग्रेसच्या काळात ममता बॅनर्जींनी बंगाल हा काळा बाजार, दलाल आणि सिंडिकेंटच्या हवाली केला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

7. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर स्कुटी चालवली. तेव्हा तुम्ही सुखरुप राहावे, अशी प्रार्थना सगळे करत होते. नशीबाने तुम्ही पडल्या नाहीत, अन्यथा ज्या राज्याची स्कुटी आहे, त्यांच्याशी तुम्ही शत्रुत्त्व पत्कारले असते. मात्र, आगामी निवडणुकीत नंदीग्रमामध्ये ममता बॅनर्जींची स्कुटी पडेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाणला.

8. गेल्या दहा वर्षात पश्चिम बंगालमध्ये असे एकही घर नसेल की तेथील महिला रडली नसेल. याला मोजकेच अपवाद असतील. मात्र, बंगालमध्ये होत असलेल्या अत्याचारांमुळे राज्यातील महिलांवर सातत्याने रडण्याची पाळी येत आहे. मात्र, भाजपची सत्ता आल्यास महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालमध्ये मोठ्याप्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच पश्चिम बंगालमध्ये रोजगार आणि उत्पन्नाची नवी साधने निर्माण करु, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनांमुळे देशभरात घर, गॅस आणि वीजेच्या सुविधा पोहोचल्या. मात्र, पश्चिम बंगालमध्ये अजूनही दीड कोटी घरांमध्ये पाणी नाही. आर्सेनिकयुक्त पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आम्ही घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी दिलेला पैसा ममता बॅनर्जी यांच्या सरकारने खर्चच केला नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

10. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. ‘लोकसभा मे TMC हाफ, इस बार पुरी साफ’, असा नाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

 

(PM Narendra Modi in Kolkata rally)