पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका, 24 तासांत TMC च्या दोन बड्या खासदारांवर जीवघेणा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत
पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार उफाळला असून सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दुचाकीवरून ओढून हल्ला केल्यानंतर, आता हुगळीत टीएमसीचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर लेदर बॉलने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात तृणमूल काँग्रेसच्या (TMC) दोन बड्या खासदारांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, रविवारी हुगळी जिल्ह्यात पक्षाचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही आंदोलकांनी जीवघेणा हल्ला केला. या दोन्ही घटनांमुळे बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
कल्याण बॅनर्जी यांच्यावर लेदर बॉलने हल्ला
रविवार ३१ मे रोजी हुगळी जिल्ह्यातील चंडीताला पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी कल्याण बॅनर्जी हे चंडीताला या ठिकाणी गेले होते. यावेळी ते पोलिसांना निवेदन देणार होते. ते कारमधून उतरून चंडीताला पोलीस ठाण्याच्या दिशेने पायी जात असताना अचानक आंदोलकांच्या एका मोठ्या जमावाने त्यांना घेरले. यानंतर अचानक काळे झेंडे दाखवत चोर, चोर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
यादरम्यान जमावातून त्यांच्यावर दुरुन दगडफेक करण्यात आली. तसेच एक चेंडूही त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला. हा चेंडू थेट त्यांच्या डोक्याला लागल्याने कल्याण बॅनर्जी रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळले. यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना सावरले. यानंतर त्यांना गर्दीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर संतप्त टीएमसी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला
दरम्यान या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी शनिवारी (३० मे) दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर शहरात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर भीषण हल्ला झाला होता. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील एका मृत टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी अभिषेक बॅनर्जी तेथे गेले होते.
सोनारपूरमधील रस्ते अरुंद असल्याने अभिषेक बॅनर्जी एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर मागे बसून पुढे जात असताना स्थानिक लोकांच्या संतप्त जमावाने त्यांना अडवले. यानंतर जमावाने थेट अभिषेक बॅनर्जी यांची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली ओढले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांचा शर्टही फाडला. या झटापटीत त्यांचा चष्मा फुटला. यानंतर जमावाकडून सतत दगड, अंडी आणि बूट फेकण्यात आले.
या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहताच सुरक्षा रक्षकांनी आणि समर्थकांनी तातडीने एका स्थानिक क्रिकेटपटूचे हेल्मेट आणून अभिषेक बॅनर्जी यांच्या डोक्यावर घातले. याच हेल्मेटच्या साहाय्याने त्यांनी स्वतःचा बचाव केला आणि गर्दीतून कसाबसा जीव वाचवून ते बाहेर पडले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या दोन्ही हल्ल्यांमागे थेट भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. भाजप आमच्या नेत्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा पक्षाने केला आहे. दुसरीकडे, भाजपने या दोन्ही घटनांमधील आपला सहभाग पूर्णपणे नाकारला आहे. “या हल्ल्यांशी भाजपचा काहीही संबंध नसून, हा तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा आणि स्थानिक जनतेच्या तीव्र संतापाचा परिणाम आहे,” असा पलटवार भाजप नेत्यांनी केला आहे.