
उन्हाळा सुरू झाला आहे, उन्हाळ्याची चाहुल लागलाच अनेकांची पाऊलं वळतात ती रसवंती गृहाकडे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही कोणत्याही रसवंती गृहामध्ये जा त्या रसवंती गृहाला नवनाथ रसवंती गृह किंवा कानिफनाथ रसवंती गृह असंच नाव का असतं? काय आहे या मागे नेमकं कारण?

तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचा शोध घ्यायाचा असेल तर आपल्याला 70 ते 80 वर्षमागे जावं लागंत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बोपगाव नावाचं गाव आहे, या गावामध्ये सुरुवातीपासून उसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं, मात्र सुरुवातीच्या काळात कारखाने नसल्यामुळे उसाला मागणी नव्हती.

उसाला मागणी नसल्यामुळे म्हणावा तेवढा भाव मिळत नव्हता. मात्र त्या गावातील एक तरुण नोकरीच्या शोधात मुंबईला आला, तेव्हा त्याला मुंबईत अनेक ठिकाणी रसवंती गृह दिसले, तेव्हा त्याला असं वाटलं आपल्या उसाला मुंबईत चांगलं मार्केट मिळू शकतं.

त्यानंतर त्या तरुणाने पहिल्यांदाच रसवंती गृहाचा प्रयोग केला. त्याला त्यात चांगलं यश देखील मिळालं आणि त्याच्या उसाला भाव देखील मिळाला. त्यानंतर हळू -हळू या गावातील जवळपास सर्वच नागरिक रसवंती गृहाच्या व्यवसायात उतरले.

आजही मुंबईत अनेक ठिकाणी याच परिसरातील व्यवसायिकांचे रसवंती गृह आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान बोपगावच्या डोंगरावर नाथसंप्रदायातील 9 नाथांपैकी एक असलेले कानिफनाथ हे तपश्चर्येला बसले होते. त्यामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात कानिफनाथ यांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या नावावरूनच मग रसवंती गृहांना पुढे कानिफनाथ रसवंती गृह असं नाव देण्यात आलं, काही ठिकाणी नवनाथ रसवंती गृह असं देखील नाव पाहायला मिळतं.

दरम्यान या नावामागे आणखी एक दंतकथा आहे. ते म्हणजे ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो. हत्तीच्या कानातून कानिफनाथांची उत्पत्ति झाली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे देखील अनेक ठिकाणी रसवंती गृहाला कानिफनाथ असं नाव देण्यात येतं.

त्यामुळे तुम्ही कुठेही प्रवास करत असाल, पुण्याला जा, मुंबईला जा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रसवंती गृहाला कानिफनाथ किंवा नवनाथ असंच नाव दिसून येईल.