एक IAS अधिकारी, ज्यावर ममता-मोदींची टक्कर जारी, मुख्य सचिव वादाच्या भोवऱ्यात

| Updated on: May 31, 2021 | 11:44 AM

पश्चिम बंगालमधल्या निवडणुका संपल्या, जनतेनं निकाल दिला, ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्या. मोदी-शाहा जोडीला मोठा धक्का बसला. ('Withdraw order recalling chief secretary,' Mamata Banerjee writes to PM Modi)

एक IAS अधिकारी, ज्यावर ममता-मोदींची टक्कर जारी, मुख्य सचिव वादाच्या भोवऱ्यात
Alapan Bandhyopadhyay
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमधल्या निवडणुका संपल्या, जनतेनं निकाल दिला, ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्या. मोदी-शाहा जोडीला मोठा धक्का बसला. पण अजूनही ममता-मोदींमधला संघर्ष संपताना दिसत नाहीये. फरक फक्त आता एवढाच की, हा विरोध प्रशासकीय अधिकाऱ्यांवरुन होताना दिसतोय. केंद्र सरकारनं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांची बदली केली आणि केंद्रात बोलावून घेतलं पण ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिवांना मुक्तच केलं नाही. उलट पंतप्रधान मोदींना तीन पानी खरमरीत पत्रं लिहिलंय. त्यावरुन पुन्हा वाद होण्याची चिन्हं आहेत. (‘Withdraw order recalling chief secretary,’ Mamata Banerjee writes to PM Modi)

मुख्य सचिवांवर नेमका वाद काय झाला?

अलपन बंडोपाध्याय हे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आहेत. त्यांची सेवा आधीच संपलीय. पण कोरोनाचा काळ पहाता ममता बॅनर्जींनी त्यांची सेवा तीन महिने वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती केली. ती विनंती मान्यही झाली. त्यानंतर बंडोपाध्याय हे मुख्य सचिवपदी कायम राहीले. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ वादळाने धूमाकुळ घातला. प्रचंड नुकसान झालं. त्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान म्हणून मोदी प. बंगालच्या दौऱ्यावर गेले. त्या दौऱ्यावरुनही मोठा वाद झाला. ममता बॅनर्जींनी नुकसानीचा अहवाल मोदींना सोपवला आणि त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. ममतांना ज्या शुभेंदू अधिकारींनी विधानसभेत पराभूत केलं, ते आता प.बंगालचे विरोधी पक्ष नेते आहेत, मोदींनी त्यांना बैठकीला आमंत्रित केलं, त्यावर ममता नाराज होत्या. त्यामुळे मोदींसोबतची बैठक जवळजवळ त्यांनी टाळलीच. याच बैठकीला मुख्य सचिव अर्धा तास उशिरा पोहोचले. म्हणजे मुख्य सचिवांनी थेट पंतप्रधानांना वाट पहायला लावली. परिणामी केंद्र सरकारनं मुख्य सचिवांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली.

दिल्लीत अलपन बंडोपाध्याय पोहोचलेच नाहीत

मुख्य सचिव बंडोपाध्याय यांची बदली झाल्यानंतर त्यांना आज दिल्लीत नॉर्थ ब्लॉकमधल्या स्टाफ आणि ट्रेनिंग ऑफिसमध्ये रुजू होण्यास सांगितले होते. त्यासाठी सकाळी 10 वाजताची वेळही दिलेली होती. पण बंडोपाध्याय पोहोचलेच नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय बंडोपाध्याय यांना सध्यस्थितीत मुक्त करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. एवढच नाही तर बंडोपाध्याय यांची केलेली बदली वापस घेण्याची मागणीही ममता बॅनर्जींनी केलीय.

बंडोपाध्याय यांच्या बदलीवर सल्लामसलत नाही

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन पानी पत्रं पंतप्रधानांना लिहिलं आहे. यात त्यांनी मुख्य सचिव बंडोपाध्याय यांची बदली करताना केंद्रानं कुठलाही सल्लामसलत केला नसल्याचा आरोप केला आहे. केंद्रानं एकतर्फी केलेल्या बदलीवर दु:खी असल्याचही ममता बॅनर्जी म्हणाल्यात. सध्याच्या कोरोना आणि नंतर आलेलं यास चक्रीवादळ अशा परिस्थितीत मुख्य सचिव असलेल्या बंडोपाध्याय यांना रिलिव्ह करणं शक्य नसल्याचं ममतांनी केंद्राला कळवलं आहे. (‘Withdraw order recalling chief secretary,’ Mamata Banerjee writes to PM Modi)

 

संबंधित बातम्या:

ममतादीदींनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या

Cyclone Yaas: PM मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

आता आपला देश षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसा तसे उत्तर देतोय; मोदींची ‘मन की बात’

(‘Withdraw order recalling chief secretary,’ Mamata Banerjee writes to PM Modi)