गवत कापताना चकाकणारा तुकडा दिसला म्हणून खोदत गेली आणि..हाती लागलं कोट्यवधीच घबाड

काकतीयच्या शासकांनी वारंगल किल्ला, हजार खांबाचं मंदिर आणि युनेस्कोच्या यादीत असलेलं रामप्पा मंदिर बनवलं. हे राज्य अपार संपत्ती, सोनंनाणं, हीरे आणि महागड्या दागिन्यांसाठी ओळखलं जायचं.

गवत कापताना चकाकणारा तुकडा दिसला म्हणून खोदत गेली आणि..हाती लागलं कोट्यवधीच घबाड
Gold In Farm Field
| Updated on: Jul 02, 2026 | 1:53 PM

शेतात, घराच्या अंगणात सोनं पुरुन ठेवल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण आता प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. 24 जून रोजी एक महिला मजूर सहा एकरच्या शेतात गवत कापत होती. त्यावेळी तिला मातीत धातूचा चमकदार तुकडा चकाकताना दिसला. तिने तिथे आणखी खोदकाम केलं, तेव्हा तिला त्या जागेत सोन्याचे दागिने सापडले. त्या शेतातून जवळपास 50 तोळे सोनं मिळाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत तिथे किती तोळं सोने मिळालं, त्याची किंमत या बद्दल काहीही पृष्टी केलेली नाही. तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील एका शेतात ही घटना घडली. आता या सोन्याच्या मालकी हक्कावरुन वाद निर्माण झाला आहे.

जो त्या जमिनीचा मालक होता, त्याला ते सर्व सोनं मजुरांनी देऊन टाकलं असं ग्रामस्थांनी सांगितलं. या जमिनीची आधी जो मालक होता, त्याच्या मुलाने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ही जमीन विकण्याआधी आपल्या मालकीची होती. सध्याचा मालक आणि मजुरांनी मला कळवल्याशिवाय ते सोनं आपसात वाटून घेतलं असं आधीच्या शेत मालकाचं म्हणणं आहे.

पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चाललाय?

हे सोनं ज्या जमिनीत सापडलय ती जमीन आधी आमच्या कुटुंबाच्या मालकीची होती असं त्याने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सोनं मिळाल्याबद्दल मला काही कळवण्यात आलं नाही. मला हिस्सा दिला नाही असं आधीच्या जमीन मालकाचं म्हणणं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हे दागिने तिथे कसे सापडले आणि त्यावर खरा अधिकार कोणाचा आहे, हे आता पोलीस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. चेन्नाराओपेट मंडलमधील कोपाकुलापाडु गावचं हे प्रकरण आहे.

अपार संपत्ती, सोनंनाणं ही या राज्याची ओळख

ही बातमी पसरल्यानंतर गावातील लोक आता, जिथे सोनं सापडलं, ती जागा उत्सुक्तेपोटी पहायला जात आहेत. वारंगलच्या समृद्ध इतिहासाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वारंगल आधी ओरुगल्लू नावाने ओळखलं जायचं. काकतीय राजवंशाची इथे राजधानी होती. 12 व्या आणि 14 व्या शताब्दीत तेलुगु क्षेत्राच्या मोठ्या भागावर त्यांनी शासन केलं. काकतीयच्या शासकांनी वारंगल किल्ला, हजार खांबाचं मंदिर आणि युनेस्कोच्या यादीत असलेलं रामप्पा मंदिर बनवलं. हे राज्य अपार संपत्ती, सोनंनाणं, हीरे आणि महागड्या दागिन्यांसाठी ओळखलं जायचं.

Follow Us