मुंबईः “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे (Chavdar Tale) पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना उपस्थितांना उद्देश्यून हे त्यांनी भाषण केले होते. महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. त्यानंतर हा दिवस हा दिवस ‘समता दिन’ (Equality Day) तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.
महाड हे कोकणातील शहर या सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व ती तयारी दाखवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय सहभागी झाले ते अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्यासोबतच अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मदत करण्यासाठी या सत्याग्रहात उतरले होते.
महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी 1927 मध्ये स्वतः नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांनी सर्व सरकारी संपत्ती, सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सभा घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली आणि सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधील पाणी प्यायले, आणि त्यानंतर जमलेल्या सर्वजणांनी तळ्याचे पाणी प्यायले. त्यावेळी म्हणजे 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सत्याग्रहासाठी महिला आणि पुरुष मिळून अशी पाच हजार माणसं त्याकाळी उपस्थित होती असा संदर्भ दिला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला तो दिवस म्हणजे समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कांसाठी बाबासाहेब यांनी आजन्म लढा दिला. त्या सामाजिक लढ्यातील एक महत्वाचा लढा म्हणजे चवदार सत्याग्रहाचा लढा.
या लढ्याला इतिहासात यासाठी महत्वाचे स्थान आहे कारण, जनावरांपेक्षाही हीन पद्धतीची वागणूक ही दलित समाजाला दिली जात होती. गावाकुसाबाहेरच जिणं दलितांशिवाय कुणाच्याच वाट्याला आलं नव्हतं, कारण त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीत झाला होता. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या या समाजाला मुक्त करणे गरजेचे होते, म्हणून यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळच्या आपल्या भाषणात म्हणतात की, ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठा आहे.’ कारण त्याकाळी उच्चवर्णियांकडून मिळणारी अपमानस्पद वागणून, गुलामगिरी, आणि निसर्गाची देणगी असणारे पाणीही अस्पृश्यांना पिण्याचा किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. भारतात असणाऱ्या जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना हिंदूपासून वेगळे ठेवण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारण्यात तर आलाच पण दलितांना मुख्य रस्त्यावरुन चालण्यास देखील त्या काळी मनाई करण्यात आली. मानवतावादाच्या दृष्टीकोनातूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कांसाठी लढा कायम ठेवला.
दलितांसाठी अस्पृश्यतेचं जिणं भारतात सर्वत्र होतंच मात्र त्याकाळी म्हणजेच 1923 साली मुंबई कायदे मंडळाने एक महत्वाचा निर्णय पारित केला. त्यामध्ये म्हटले होते की, सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही हक्क असणार आहे. त्यानंतर महाड नगरपालिकेने जानेवारी 1924 रोजी या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित करण्यात आला मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे या सत्याग्रहासाठी उच्च जातीय हिंदूनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले.
महाड चवदार तळ्याचे आंदोलनदेखील नंतरच्या काळात पूर्णपणे यशस्वी झाले असल्याचा संदर्भ येथील इतिहास देतो. म्हणून भारतीय राज्यघटनेनुसार आणि कलम १७ प्रमाणे अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. घटनेच्या समतेच्या अधिकारामध्ये मंदिर, सार्वजनिक पाणवठे, उपाहारगृहे सर्वांसाठी मुक्त करण्यात आली. जातीवरून कुणाला अडविल्यास तो गुन्हा ठरविण्यात आला.
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता. तो हिंदू समाजाच्या रूढी-परंपरांच्या विरोधी होता. तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता, आणि धर्मसुधारणेचाही लढा होता. म्हणून तो हिंदू संघटनेचादेखील लढा होता. याबाबतचे विस्तृत लेखन डॉ. बाबासाहेब यांनी ‘बहिष्कृत भारत’मधील लेखांतून केलेले आहे.
संबंधित बातम्या
Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाला मोठं वळण, खुन्यांची ओळख अखेर पटली
टाटा समुहाकडून लवकरच UPI अॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर