ऐश्वर्याच्या Ex सोबत अभिषेक करणार काम, 22 वर्षानंतर दिसणार एकत्र, सिनेमाचे नाव काय?
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. तिच्याविषयी सतत जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. आता ऐश्वर्याचा पती, अभिनेता अभिषेक बच्चन ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत काम करणार असल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या यशापेक्षा अनेकदा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचीच जास्त चर्चा रंगते. कलाकारांची प्रेमप्रकरणं, मैत्री आणि वाद चाहत्यांच्या कायम कुतूहलाचा विषय असतात. अशाच एका जुन्या नात्याची चर्चा सध्या पुन्हा सुरू झाली आहे.

एकेकाळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडली होती. मात्र, सलमानचा स्वभाव आणि त्यांच्यातील वादामुळे हे नातं टिकू शकलं नाही. त्यानंतर ऐश्वर्या विवेक ओबेरॉयला डेट करत होती. मात्र, हे नातं देखील फार काळ टिकले नाही.

पुढे 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी विवाह केला आणि तेव्हापासून सलमान-ऐश्वर्या कधीही एकत्र दिसले नाहीत. इतकंच नाही तर, वैयक्तिक कारणांमुळे अभिषेक आणि सलमान यांच्यातही कमालीचा दुरावा निर्माण झाला होता.

गेल्या 22 वर्षांपासून ज्या दोन मोठ्या स्टार्सनी एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणं टाळलं होतं, त्यांना आता रितेश देशमुखने आपल्या 'राजा शिवाजी' या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी एकत्र आणलं आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक मोठे 'सरप्राईज' मिळणार आहे.

'राजा शिवाजी' या चित्रपटात अभिषेक बच्चन 'छत्रपती संभाजी महाराज' यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सलमान खान या चित्रपटात 'जीवा महाला' यांच्या भूमिकेत पाहुणा कलाकार (कॅमिओ) म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या 'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेमध्ये रितेश देशमुखने ही अधिकृत घोषणा केली. जेव्हा रितेशने सलमान या फिल्मचा भाग असल्याचे सांगितले, तेव्हा प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या अभिषेक बच्चननेही हसून आणि टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.

2004 च्या 'फिर मिलेंगे' चित्रपटानंतर आता हे दोन दिग्गज कलाकार तब्बल दोन दशकांनी एकाच चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.