
केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून केरलम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे नाव बदलण्याबाबतचा प्रस्तावर खुद्द केरळच्याच सरकारने केंद्राकडे पाठवला होता. आता केरळ हे राज्या यापुढे केरलम या नावाने ओळखले जाणार आहे.

दरम्यान, केरळ राज्याचे नाव बदलल्यानंतर आता आणखी एक मोठी मागणी समोर येत आहे. भाजपाचे नेते तथा खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी थेट राजधानी दिल्लीचे नाव बदलावे अशी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राजधानी दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' असे करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्ली हे नाव मध्यकालीन तसेच वसाहतवादी कालखंडाचे आहे. तर इंद्रप्रस्थ या नावातून प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते, असे खंडेलवाल म्हणाले.

दिल्ली हे नेहमी राजधानीचे शहर राहिलेले आहे. त्यामुळे या शहरावर नेहमीच वेगवेगळ्या राजा-महाराजांनी हल्ले केलेले आहेत. या हल्ल्यांमध्ये दिल्ली शहर अनेकदा उद्ध्वस्त झालेले आहे. परंतु नव्याने हे शहर उभे राहिलेले आहे. इतिहासातील नोंदीप्रमाणे दिल्ली हे शहर इतरही काही नावांनी ओळखले जायचे.

याआधी दिल्ली शहराला दिल्लिका, दहली, तुघलकाबाद, शाहजहानाबाद, नवी दिल्ली या नावांनी ओळखले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर दिल्ली नावाने ओळखले जाते. याआधीही भारतात कलकत्ता या शहराचे नाव बदलून कोलकाता, इलाहाबादचे प्रयागराज, मद्रासचे चेन्नई, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झालेले आहे. त्यामुळे दिल्ली शहराचे नावही भविष्यात बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.