
अमरावती विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आज खुले होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. अख्खं मंत्रिमंडळच या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहे.

अमरावती विमानतळाची निर्मिती 1992 मध्ये झाली होती. तेव्हापासून हे विमानतळ फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी सुरू होते. आजपासून मात्र सर्वसामान्य लोकांना या विमानतळावरून प्रवास करता येणार आहे.

या विमानतळाच्या धाववपट्टीची लांबी 1850 मीटर असून 45 मीटर रुंद आहे. याच विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठ्या एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. एकाच वेळी या विमानतळावर ATR/ 72 सीटर असे दोन विमान पार्किंग होऊ शकतात. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू होणार आहे.

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना विमानाच्या माध्यमातून मुंबईत लवकर पोहोचता येईल. आधी मुंबईला विमानाने जायचे झाल्यास अमरावतीवरून नागपूरला जावे लागायचे. त्यासाठी दीडशे किलोमीटर प्रवास करावा लागायचा. परंतु आता हा प्रवास वाचणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे साडेतीन तास वाचणार आहेत.

विमानसेवेमुळे अमरावतीच्या दळणवळणाला चालना मिळेल. विमान सेवेमुळे अमरावती शहराच्या औद्योगिक विकासाला तसेच कापड उद्योगाला नवीन कलाटणी मिळेल.

हे विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे आहे. दुरांतो एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीपेक्षा कमी दर मुंबई विमान प्रवासाचा आहे. दरम्यान भविष्यात मागणीनुसार तिकिटांचे दर वाढू शकतात.

आधी अमरावतीवरून रेल्वेने मुंबईला जायचे झाल्यास 10 ते 12 तास लागत होते. परंतु आता पावणे दोन तासात मुंबईला पोहोचता येणार आहे. आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी अमरावतीवरून हे विमान मुंबईला जाईल.

हे विमान मुंबईवरून दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी टेक ऑफ होईल. त्यानंतर अमरावतीवरून 4 वाजून 40 मिनिटांनी मुंबईसाठी रवाना होईल. सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी मुंबईत दाखल होईल. दरम्यान एअरअलाइन्सने जाहीर केलेल्या विमानाची सुटेबल नसल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे वेळेत बदल करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, या विमानतळाच्या नामांतरावरून सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. देशाचे पाहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव विमानतळाला दिले पाहिजे, अशी अनेकांनी मागणी केली आहे. तर काहींनी श्री संत गुलाबराव महाराजांचे नाव या विमानतळाला देण्याची मागणी केली आहे.