तशी घटना घडलीच नाही, पिस्तुल लावून धमकी… हे फक्त कुंभाड; धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती उघड
धनंजय देशमुख यांच्यावर समाधान खिंडकर यानेच पिस्तुल लावून आपल्याला धमकावल्याची तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास केला असताना पोलिसांना या प्रकरणात दोन्ही बाजूंनी खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

Dhananjay Deshmukh : मस्साजोग येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप झाला. धनंजय देशमुख यांच्याविरोधात समाधान खिंडकर यांनी ही फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आता पोलिसांच्या प्राथमिक तपासात सत्य भलतेच असल्याचे उघडकीस आले आहे.
बीडच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलवर धनंजय देशमुख यांनी आपल्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली, असा खळबळजनक आरोप समाधान खिंडकर यांनी केला होता. धनंजय देशमुख हे बीड येथील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याने हे प्रकरण देशभर गाजले होते. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे. धनंजय देशमुख यांच्याविरोधात समाधान खिंडकर याच्या दाखल फिर्यादीनुसार आता धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात समाधान खिंडकर याने तक्रार देत धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून आपल्याला धमकी दिल्याचे म्हटले होते. यावरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सकाळपासून कसून तपास केला. घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांची तपासणी केली असता, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई
यानंतर धनंजय देशमुख यांनी देखील समाधान खिंडकर यानेच उलट धमकावल्याची तक्रार दिली होती. दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी जाणूनबुजून पोलिसांत खोटी तक्रार दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून, खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान आपण पोलिसांना रात्रीच शहानिशा करून पुढील कारवाई करा असे सांगितले होते. मात्र कुठली एवढी गडबड झाली होती माहित नाही. त्यांनी पहाटेच हा गुन्हा दाखल करून घेतला, मात्र आता तपासात असं काही घडलं नाही हे सर्व काही खोटं आहे हे निष्पन्न झालं आहे असं धनंजय देशमुख यांनी बोलताना सांगितले.
