डोक्यावर 48000 रुपयांचा हप्ता, तरी सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; अंशुमन विचारेनं सांगितलं खरं कारण
अंशुमन विचारेनं जेव्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडली, तेव्हा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. त्याने लॉकडाऊनच्या काळात हा निर्णय घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंशुमनने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रिय झाले. त्यापैकीच एक आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता अंशुमन विचारे होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडला होता. त्यावेळी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता त्याने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंशुमन म्हणाला, "कोरोना महामारी आणि लॉकडाऊनपूर्वी माझं करिअर जोरात सुरू होतं, चांगली कमाई होत गेली. त्याच जोरावर मी पुण्यात एक नवीन घर खरेदी केलं होतं. पण त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी हास्यजत्रेच्या टीमने बायो बबलमध्ये शूटिंगचा निर्णय घेतला होता."

"माझी मुलगी त्यावेळी फक्त दीड वर्षांची होती. तिला आणि माझ्या कुटुंबाला सोडून मी अनेक दिवस बायोबबलमध्ये शूटिंग करण्यास तयार नव्हतो. याशिवाय कामातही तोच-तोचपणा आला होता. कलाकार म्हणून माझी एक्स्पायरी डेट जवळ आली की काय, अशी भीती वाटू लागली होती. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता", असं अंशुमनने स्पष्ट केलं.

ब्रेक घेण्याच्या निर्णयाबद्दल अंशुमन भावूक होत पुढे म्हणाला, "डोक्यावर नवीन घराचा 48 हजार रुपयांचा हप्ता आहे. पुढे काय करायचं, कसं करायचं, असं जेव्हा बायकोला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, तुला जर तिथे काम करायचं नसेल, तर ठीक आहे. आपण घराचे हप्ते मॅनेज करू. अगदीच बेताची परिस्थिती झाली तर आमटी-भात, खिचडी खाऊन दिवस काढू. पण तू हार मानू नकोस. तिच्या पाठिंब्यामुळेच मी तो काळ मुलीसोबत घालवू शकलो."

अंशुमनने फार विचार करून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. चौकटीतून बाहेर पडल्यानंतर खरा विकास होतो, हे त्याने सिद्ध केलं. आता तो 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.