
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अमोलला दिवाळीत आनंदित ठेवण्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रयत्न करतंय. अमोलच्या मन:शांतीसाठी अमोलला झालेल्या आजाराचं सत्य लपवण्याचा निर्णय स्वप्नील आणि रुपालीने घेतलाय.

दिवाळीच्या तयारीत सगळे असतानाच दीप्या अमोलच्या आजाराचं सत्य सर्वांसमोर मांडतो. हे ऐकून सगळे हादरतात. रुपाली आणि तिच्या कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. अमोल त्यांना समर्थन देत सांगतो की, हे सत्य लपवण्यामागे त्यांचा हेतू चांगला होता.

ज्यामुळे अर्जुन आणि अप्पी त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा विचार करतात. कुटुंबातील या वादानंतर अमोल सगळ्यांना दिवाळीसाठी एकत्र आणतो आणि कामाची विभागणी करतो.

बापू आणि विनायक यांना यामुळे थोडी आशा वाटतेय. पण तरीही अप्पी आणि रुपाली यांच्यातील तणाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवाळीच्या सकाळी अमोल सर्वांना उठवून तयारीसाठी एकत्र करतो.

ते सगळे घर सजवतात, पूजाविधी करतात, पण वातावरणात पुन्हा गंभीरता येते, जेव्हा अप्पी आणि अर्जुन अमोलला डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर त्यांना केमोथेरपी हा एकमेव उपाय असल्याचं सांगतात.

या उपचारामुळे घाबरलेले अप्पी आणि अर्जुनसमोर आलेल्या आव्हानांचा सामना करण्याचं ठरवतात. रुग्णालयात संकल्प अमोलला एका पत्रकार परिषदेतला व्हिडिओ दाखवतो, ज्यात अप्पी आणि अर्जुन फक्त अमोलसाठी एकत्र असल्याचं सांगतात. हे पाहून दुखावलेला अमोल, तिथून निघून जातो.