
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन डे'ला तिने लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अपूर्वाने तनुज गोवळकरशी लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मोजकेच पाहुणे उपस्थित होते. 'आयुष्याने माझी परीक्षा घेतली, अनेक चढउतार अनुभवले, तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही. एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे, असंही अपूर्वाने स्पष्ट केलं. तनुजचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यास लक्षात येतं की त्याला फिरायची खूप आवड आहे आणि तो विविध देशांमध्ये फिरला आहे.

अपूर्वा नेमळेकरने 2014 मध्ये रोहन देशपांडेशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाविषयी ती विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

आज मी प्रचंड आनंदी आणि कृतज्ञ आहे. या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायम सोबत राहू द्या.. असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचप्रमाणे अत्यंत समजूतदारपणे हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं आहे.