
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अटक होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांसोबत खरातची गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. ही बैठक कशासाठी आणि का झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रकरणाला राजकीय-प्रशासकीय स्तरावर मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक शिर्डीतील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये पार पडली. खरातसाठी एक पंचतारांकित हॉटेल, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी दुसरे हॉटेल बुक करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बैठक ही तिसऱ्या हॉटेलमध्ये घेण्यात आली. या बैठकीची मध्यस्थी 'विनोद' नावाच्या व्यक्तीने केल्याची माहिती आहे. विनोद हा शिर्डी परिसरातील खरातचा जवळचा पंटर (मध्यस्थ) असल्याचे सांगितले जात आहे. त्याने तीन IAS अधिकाऱ्यांची भेट घडवून आणण्यासाठी हॉटेल बुकिंग ते इतर व्यवस्था केल्याची चर्चा आहे.

विनोद नावाच्या या व्यक्तीने खरातच्या प्रभावक्षेत्रात मध्यस्थीची भूमिका बजावली असून, आता पोलिस आणि विशेष तपास पथक (SIT) त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा खरातच्या आर्थिक आणि सामाजिक नेटवर्कचा महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे त्याच्या चौकशीतून आणखी अनेक नावे आणि व्यवहार समोर येऊ शकतात.

सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे, राज्यातील तीन IAS अधिकारी कोण होते? ही माहिती अद्याप उघड झालेली नाही. मात्र, खरातला अटकेची चाहूल लागली असताना ही बैठक का आणि कशासाठी झाली, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. काही सूत्रांच्या मते, ही बैठक सेटलमेंट किंवा संरक्षणासाठी असू शकते, तर काहींच्या मते अटक टाळण्यासाठी किंवा प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न झाले असावेत. एसआयटीच्या तपासात नावे आणि बैठकीचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आणि आयकर विभागाच्या चौकशीसोबतच हे नवीन प्रकरण समोर आले आहे. एसआयटीकडून (तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली) खरातची सखोल चौकशी सुरू असून, आता या बैठकीचा आणि विनोदच्या भूमिकेचा तपास होणार आहे. यातून खरातच्या प्रभावक्षेत्रातील प्रशासकीय आणि राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.