बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला विधानसभेच्या ७८ जागांसाठी मतदान पार पडेल. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज नेते प्रचार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अररिया मतदारसंघात जाहीर सभा घेत काँग्रेस आणि राजद (RJD)वर जोरदार हल्ला चढवला. डबल युवराज आणि जंगलराज या मुद्द्यांवरुन मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाही बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात उतरले आहेत. प्रचारसभेदरम्यान खाली उतरुन नड्डा यांनी मतदारांशी संवाद साधला..
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही एका प्रचारसभेत हात जोडून मतदारांना जनता दल (संयुक्त) अर्थात JDUच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
बाबुबरही विधानसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार अमरनाथ प्रसाद यांच्या प्रचारसभेत पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान सहभागी झाले आणि मतदारांना LJP उमेदवारांना निवडणून देण्याचं आवाहन केलं.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बहादुरजंग विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. त्यांनी सत्ताधारी नितीश कुमार आणि विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला.
बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.