
खडकाळ आणि पडीक जमीन, पारंपारिक शेतीला मिळणारा कमी दर आणि कुटुंबाची जबाबदारी... या सर्व अडचणींवर मात करून बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

महेंद्र देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून तो बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात किन्ही महादेव या ठिकाणी राहतो. त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे शिकण्याऐवजी त्यांनी वडिलोपार्जित शेती सांभाळण्याचा निर्णय घेतला.

पण खडकाळ जमीन आणि पारंपरिक पिकांमधून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे शेती करणे फायदेशीर ठरत नव्हते. अशा परिस्थितीत, त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला.

राम पवार नावाच्या कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र देशमुख यांनी आपल्या आठ एकर खडकाळ जमिनीवर पपईची लागवड केली. शेती माळरानावर असल्याने दोन किलोमीटर लांबून पाणी आणून ठिबक सिंचनाने ते पपईच्या रोपांना दिले.

विशेष म्हणजे, त्यांनी या शेतीत रासायनिक खते किंवा औषधांचा वापर न करता, पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पपईची मशागत केली. या मेहनतीचे फळ त्यांना सहा महिन्यांत मिळाले. आता त्यांची पपई तोडणीसाठी तयार झाली आहे.

दर आठवड्याला पाच टनांपेक्षा जास्त पपईची तोडणी होत आहे. या पपई बागेतून त्यांना सुमारे 40 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पपईसोबतच त्यांनी आंतरपीक म्हणून टरबूज आणि खरबूज पिकांचेही चांगले उत्पादन घेतले आहे.

महेंद्र देशमुख यांनी याबद्दल बोलताना सर्व शेतकऱ्यांना एक तरी फळबाग लावण्याचे आवाहन केले आहे. महेंद्र देशमुख यांनी खडकाळ जमिनीचे सपाटीकरण करून केवळ मेहनतीच्या जोरावर लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन नंदनवन फुलवले आहे.

पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता योग्य नियोजन आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती केल्यास किती फायदा होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.