
डोंबिवली-दिवा दरम्यानच्या पनवेल-वसई मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागते.

पश्चिम उपनगरांशी कमी वेळेत जोडणाऱ्या या मार्गावर १५ वर्षांनंतरही मर्यादित गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

विशेषतः सकाळी गर्दीच्या वेळी, पावणे सहा वाजल्यानंतर थेट सव्वा दहा वाजता दुसरी गाडी येत असल्याने, मधल्या काळात गाडीच नसते.

त्यामुळे सव्वा दहा वाजता येणाऱ्या गाडीला प्रचंड गर्दी उसळते.

त्यामुळे ती गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना चक्क रुळांवरून जीव धोक्यात घालून धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करावा लागतो.

या गंभीर परिस्थितीमुळे दिवा-वसई मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.