
आपल्यापैकी अनेकजण जेवण झाल्यावर एक ग्लास पाणी पितो. यानंतर आपल्याला स्वत:ला तृप्त झाल्यासारखे वाटते. पण या सवयीमुळे तुमच्या पचनसंस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. आज आपण जेवल्यानंतर पाणी प्यावे की नाही याबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात जेवणाचे काही विशेष नियम सांगितले आहेत. ज्यामध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा पोटातील जठराग्नी म्हणजे पाचन अग्नी अन्न पचवण्यासाठी सक्रिय होते.

अशावेळी जर आपण लगेच पाणी प्यायलो तर पाचक एन्झाइम्स आणि जठर रस पातळ होतात. परिणामी, अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे यांसारख्या समस्या सुरू होतात.

जेवणानंतर लगेच पाणी प्याल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढू शकते. जेव्हा अन्न योग्यरित्या पचत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. ते शरीरात चरबी (Fat) म्हणून साठवले जाते. यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर रक्तातील साखरेची पातळी देखील अनियंत्रित होऊ शकते.

निरोगी शरीरासाठी अन्नातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषले जाणे आवश्यक असते. पचनक्रिया मंदावल्यामुळे आतडे हे पोषक घटक शोषू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात दीर्घकाळ अशक्तपणा आणि पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते.

यामुळे जेवणापूर्वी ३० मिनिटे आणि जेवणानंतर किमान ४० ते ६० मिनिटांनी पाणी प्यावे. जर जेवताना खूप तिखट वाटले किंवा घसा कोरडा पडला, तर एक-दोन घोट कोमट पाणी किंवा ताक घेण्यास हरकत नाही. अन्न जितके जास्त चावून खाल, तितकी लाळ त्यात मिसळेल आणि तुम्हाला पाण्याची गरज भासणार नाही.