50 व्या वर्षीही ही अभिनेत्री आहे सिंगल, तरुण मुलं करतात आजही लग्नासाठी प्रस्ताव, सांगितलं कसा पाहिजे जीवनसाथी
बॉलिवूडमधील या 50 वर्षीय अभिनेत्रीला आजही तरुण मुलांकडून येतात लग्नासाठी प्रस्ताव. आजही अभिनेत्री जगतेय सिंगल आयुष्य. आता सांगितलं कसा पाहिजे जीवनसाथी?

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आजही तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘Kaho Naa... Pyaar Hai’ या सुपरहिट चित्रपटातून हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अमीषा रातोरात स्टार बनली होती.

आता 50 वर्षांची झाल्यानंतरही ती सिंगल असून तिचं आयुष्य मनमोकळेपणाने जगत आहे. मात्र तिच्या लग्नाबाबत चाहते कायम उत्सुक असतात. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अमीषाने तिला कसा लाइफ पार्टनर हवा आहे याबाबत स्पष्टपणे मत मांडलं.

मुलाखतीदरम्यान अमीषाला विचारण्यात आलं की, ती स्वतःपेक्षा कमी यशस्वी किंवा कमी श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न करेल का? यावर तिने अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. अमीषा म्हणाली की, यापूर्वी ती अशा नात्यात होती जिथे समोरची व्यक्ती तिच्यापेक्षा कमी यशस्वी होती. मात्र केवळ त्या कारणामुळे नातं तुटलं नव्हतं.

माझ्यासाठी पैसा सर्वात महत्त्वाचा कधीच नव्हता. पण याचा अर्थ असा नाही की लग्नानंतर मी तडजोडीचं आयुष्य जगावं. मला लहानपणापासून एक विशिष्ट लाइफस्टाइल मिळाली आहे आणि ती टिकवण्यासाठी मी खूप मेहनतही घेतली आहे. मी आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. कठीण दिवस अनुभवले आहेत.

आता जर मला उर्वरित आयुष्य शांततेत आणि आरामात जगायचं असेल, तर त्यात चुकीचं काही नाही. आज माझं मन झालं तर मी 10 दिवसांसाठी लंडन किंवा न्यूयॉर्कला सुट्टीसाठी जाऊ शकले पाहिजे. त्यासाठी मला असा जोडीदार हवा जो हे सगळं सहज परवडवू शकेल. मी कोणत्याही नात्यात ‘आई’सारखी जबाबदारी घेऊन राहू शकत नाही. इतकी मेहनत केल्यानंतर मला चांगलं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ती म्हणाली.

यावेळी संवादात अमीषाने आणखी एक मजेशीर खुलासा केला. ती म्हणाली की, आजही तिला स्वतःपेक्षा खूप लहान वयाच्या मुलांकडून लग्नाचे प्रस्ताव येतात. 50 वर्षांची झाल्यानंतरही अमीषा पटेल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.