
1980 चं दशक म्हणजे बॉलिवूडसाठी एक कमकुवत काळ होता. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. बहुतांश लोक त्यावेळी हिंदी चित्रपटांऐवजी हॉलिवूड मूव्ही पहायला प्राधान्य द्यायचे. यामागचं कारण चित्रपटांचा दर्जा होता असं फराह खान म्हणाली.

1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये जे बदल झाले, त्यावर सुद्धा फराह खान बोलली. इंडस्ट्रीला त्यावेळी अंडरवर्ल्डच्या वाढत्या प्रभावाचा सामना करावा लागत होता. तिने त्यावेळच्या काही धक्कादायक आठवणी सांगितल्या. तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपट निर्माते मुकेश दुग्गल यांची हत्या झाली होती.

1993-94 चा तो काळ होता. चित्रपटाच्या सेटवर ही बातमी पसरली. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये भरपूर भितीदायक वातावरण होतं. रणवीर अलाहाबादीयाने तिला बॉलिवूडचे तिन्ही मोठे स्टार सलमान, शाहरुख आणि आमिर यांच्याबद्दल प्रश्न विचारला.

1990 च्या दशकात सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यावर अंडरवर्ल्डचा दबाव होता का? असा रणवीरने तिला प्रश्न विचारला. त्यावर तिने असा दबाव होता असं उत्तर दिलं.

तिन्ही खानांवर अंडरवर्ल्डचा दबाव होता हे फराहने मान्य केलं. तिला शाहरुखला आलेल्या फोनबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने ते मला माहित नाही असं उत्तर दिलं. पण माझ्या माहितीनुसार डुप्लीकेट किंवा कुछ कुछ होता हैं च्या प्रीमियरवेळी करणला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळालेली. ते खूप भितीदायक होतं. प्रीमियर रद्द करावा की, करु नये अशी चर्चा त्यावेळी रंगलेली असं फराहने सांगितलं.