Photo Gallery : गोठ्यातली जनावरे महावितरणच्या गेटला, अन् अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव
माढा : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने केवळ रब्बी हंगामातील पिकांचाच नाही तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत तर दुसरीकडे महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा शॉक दिला जात आहे. शेतकरी दुहेरी संकटात असून किमान महावितरण कंपनीने तरी शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातील निमगाव येथील विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिके तर करपून जात आहेतच पण जनावरांना पाणी द्यायचे कसे? असा सवाल उपस्थित करीत या परसरातील शेतकरी जनावरे घेऊन थेट महावितरणच्या उपकेंद्रात दाखल झाले होते. जनावरे गेटला आणि शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव असे चित्र निमगाव उपकेंद्रावर पाहवयास मिळाले आहे.

उन्हाच्या झळा अन् शेतकऱ्यांचे आंदोलन: दिवसेंदिवस उन्हामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके ही करपून जात असून महावितरणच्या कारवाईचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. शेतामधले होत असलेले नुकसान पाहून निमगावसह पंचक्रोशीतील शेतकरी निमगावच्या उपकेंद्रावर दाखल झाले होते.

महावितरणकडून आश्वासन : वरिष्ठांच्या आदेशानेच कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. जनावरांच्या पाण्यासाठी काही वेळ पुरवठा केला जाईल शिवाय वरिष्ठांकडून आदेश येताच कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जनावरांच्या पाण्याचे काय?: पिके करपली तरी हरकत नाही पण मुक्या जनावरांना पाणी द्यायचे कसे? हा सवाल उपस्थित करीत निमगावसह परिसरातील ग्रामस्थांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. विद्युत पुरवठा खंडीत केल्याने कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याचा पाढाच शेतकऱ्यांनी वाचून दाखवला.

जनावरे गेटला अन् शेतकऱ्यांचा घेराव: जनावरांना पाणी नाही त्यामुळेच शेतकरी जनावरे घेऊन कार्यालयात दाखल झाले होते. किमान या जनावरांचा विचार करुन का हाईना विद्युत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.