
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या ताटीगुडम गावातील एका विहिरीतून चक्क गरम पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

भूगर्भातील उष्णतेचा परिणाम, खनिजांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया यामुळे हा प्रकार घडल्याचे जाणकार सांगत आहेत. सत्याना मल्लय्या कटकू यांच्या मालकीची ही विहीर असून विहिरीतून सतत गरम पाणी येत आहे.

पाणी इतके गरम आहे की ते थेट वापरणे शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळवावे लागत आहे. विहिरीतून बुडबुडे आणि वाफाही निघताना दिसून येतात. या घटनेचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक गावात जात आहेत.

या गावात जाऊन विहिरीतून पाणी काढून कुतूहलाने पाणी गरम आहे का? याची लोक तपासणी करत आहेत. गरम पाण्याच्या विहिरीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. या गरम पाण्याच्या विहिरीचे काही व्हिडीओही समोर आले आहेत.

गरम पाण्याच्या झऱ्यांची नोंद अनेक ठिकाणी झालेली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना समोर आल्याने प्रशासनाने याचे संशोधन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.