
झिम्बाब्वे विरुद्ध सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात काल टीम इंडियाने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला. पहिली फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 256 धावांचा डोंगर उभारला. फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला. त्याने (55) आणि हार्दिक पंड्याने नाबाद (50) अर्धशतकी खेळी केली.

टीम इंडियाच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. भारताने 72 धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसन (24), अभिषेक शर्मा (55), इशान किशन (38), सूर्यकुमार यादव (33), हार्दिक पंड्या (50), तिलक वर्मा (55) या सगळ्यांनी जबरदस्त फलंदाजी केली.

खरंतर भारताच्या एवढ्या विशाल लक्ष्यासमोर झिम्बाब्वे सहज गुडघे टेकेल असं वाटलं होतं. पण त्यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. यात ओपनर ब्रायनच शतक 3 धावांनी हुकलं. त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

भारत-झिम्बाब्वे मॅच आधी नेट रनरेट महत्वाचा ठरणार असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. कारण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवला. त्यामुळे आता पुढच्या भारत-वेस्ट इंडिज सामन्यात जी टीम जिंकेल तीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. हा सामना एकप्रकारे क्वार्टर फायनल आहे.

खरंतर काल भारताने एक चूक केली. झिम्बाब्वेला कमी धावसंख्येवर रोखून नेट रनरेट सुधारायला हवा होता. पण त्यांनी तसं केलं नाही. परिणामी भारतापेक्षा वेस्ट इंडिजचा रनरेट चांगला आहे. दक्षिण आफ्रिका 2 सामने, 4 पॉइंट NRR +2.890, वेस्ट इंडिज 2 सामने, 2 पॉइंट NRR +1.791, भारत 2 सामने, 2 पॉइंट NRR -0.100, झिम्बाब्वे 2 सामने, 0 पॉइंट NRR -4.475

आता 1 मार्चला भारत-वेस्ट इंडिज सामना झाला तर ग्रुप 1 मधून विजेता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला तर वेस्ट इंडिजकडे सेमीफायनल प्रवेशाची संधी असेल. कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला आहे.